ब्रेकिंग: Acharya Devvrat | आचार्य देवव्रत यांच्यावर महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार!

Who Is Acharya Devvrat: गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. त्यांना आज (15 सप्टेंबर) मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

राज्यपाल देवव्रत यांनी संस्कृतमधून शपथ घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती म्हणून निवड झाल्यानंतर देवव्रत यांच्यावर अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. आचार्य देवव्रत त्यांच्या पत्नी दर्शना देवी यांच्यासह काल 14 सप्टेंबर रोजी सकाळी अहमदाबादहून तेजस एक्सप्रेस ट्रेनने मुंबईत दाखल झाले होते.

राष्ट्रपतींनी अतिरिक्त कार्यभार सोपवला

उपराष्ट्रपती म्हणून निवड झाल्यानंतर सीपी राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार राजीनामा दिला.

त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे सोपवला. आयएएनएस वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, राष्ट्रपतींचे प्रेस सचिव अजय कुमार सिंह यांनी 11 सप्टेंबर रोजी अधिकृत आदेश जारी केला. महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या सध्याच्या कर्तव्यांव्यतिरिक्त त्यांची कामे पार पाडण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे, असे आदेशा म्हटले होते.

आचार्य देवव्रत यांचा अनुभव

आचार्य देवव्रत जुलै 2019 पासून गुजरातचे राज्यपाल आहेत. यापूर्वी त्यांनी ऑगस्ट 2015 ते जुलै 2019 पर्यंत हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या अनुभवामुळे आणि प्रशासकीय कौशल्यामुळे त्यांना महाराष्ट्राचीही जबाबदारी देण्यात आली आहे. आता ते दोन्ही राज्यांच्या कारभारावर लक्ष केंद्रित करतील आणि राज्यपाल म्हणून त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडतील.

आर्य समाज आणि स्वामी दयानंद यांच्या शिकवणींचा प्रभाव

आचार्य देवव्रत हे मूळचे हरियाणाचे आहेत. त्यांच्या आयुष्यावर आर्य समाज आणि स्वामी दयानंद यांच्या शिकवणींचा खोलवर प्रभाव आहे. रोहतकमध्ये त्यांचा जन्म झाला. राज्यपाल होण्यापूर्वी देवव्रत हे कुरुक्षेत्रातील एका गुरुकुलचे प्राचार्य होते. सरकारने त्यांना प्रथम हिमाचलचे राज्यपालपदी संधी दिली. त्यानंतर त्यांना गुजरातची जबाबदारी देण्यात आली. जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यावर उपराष्ट्रपतीपदाच्या संभाव्य नावांमध्ये त्यांचाही उल्लेख होता. नैसर्गिक शेतीला एक मिशन बनवण्यात गुंतलेले आचार्य देवव्रत अतिशय सात्विक जीवन जगतात. त्यांच्या पुढाकाराने, गुजरातमधील हलोल येथे देशातील पहिले नैसर्गिक कृषी विद्यापीठ देखील सुरू झाले आहे. अलीकडेच, आचार्य देवव्रत या विद्यापीठाला भेट देण्यासाठी आले होते. 66 वर्षीय आचार्य देवव्रत ऑगस्ट 2015 मध्ये हिमाचल प्रदेशचे राज्यपाल झाले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:12 15-09-2025