Rajapur : गुरांच्या समस्येबाबत नगरपालिका ‘अॅक्शन मोड’वर

राजापूर : शहरातील गंभीर होत असलेल्या मोकाट गुरांच्या समस्येबाबत नगरपालिका प्रशासन ‘अॅक्शन मोड’वर आले असून, गुरांना पकडण्याची कारवाई लवकरच सुरू करण्यात येणार आहे. पकडलेल्या गुरांच्या मालकाचा शोध घेण्यात येणार आहे. राजापूर शहर आणि लगतच्या गावांमधील गुरांना केलेल्या इअर टॅगिंगची माहिती पालिकेकडून राजापूर पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाकडून मागविली आहे. त्याद्वारे गुरांच्या मालकाचे नाव आणि पत्ता माहिती करून घेतला जाणार आहे, असे नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र जाधव यांनी दिली.

पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी यांना नुकतेच पालिकेने पत्र दिले आहे. त्यामुळे मोकाट गुरांच्या समस्येवर कायमस्वरूपी रोख लागेल, अशी आशा निर्माण झाली आहे. लोकांची रहदारी आणि गर्दी असलेल्या राजापूर शहरात रस्त्यासह सार्वजनिक ठिकाणी, वळणांवर मोठ्या संख्येने मोकाट गुरे बसलेली असतात. वाहनांची दिवस-रात्र सातत्याने वर्दळ असलेला मुंबई-गोवा महामार्ग, जैतापूर सागरी महामार्ग आणि रत्नागिरी-आडिवरे-राजापूर मार्गावर ठिकठिकाणी मोकाट गुरे रस्त्यात बसलेली असतात.

या गुरांमुळे अनेक वेळा अपघात होतात. त्यात गाडीचे नुकसान होताना मुक्या जनावरांना जीव गमवावा लागतो. काही वेळा या ठिकाणी या गुरांमुळे सातत्याने वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. हा प्रश्न मांडल्यानंतर प्रशासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली. त्यासाठी गुरांच्या मालकांची माहिती मिळविण्यात येणार आहे. त्यासाठी नगरपालिका प्रशासनाने पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे शहर आणि लगतच्या गावांमधील गुरांन केलेल्या टॅगिंगच्या नोंदीची माहिती मागवली आहे. त्यासोबत ज्या गुरांचे अद्यापही टॅगिंग केलेले नाही त्यांचे टॅगिंग करण्याची सूचन पत्राद्वारे पशुधन विकास अधिकाऱ्यांन केली आहे.

गुरांच्या मालकांचा शोध घेणार
मोकाट गुरांना पकडल्यानंतर त्यांना सोडवून नेण्यासाठी गुरांचे मालक पुढे येत नाहीत. त्यामुळे या गुरांच्या मालकांचा शोध घेण्यात अडचणी येतात; मात्र, पशुसंवर्धन विभागातर्फे गुरांचे इअरटॅगिंग केलेले असल्याने संबंधित गुरांच्या मालकांचा शोध घेणे अधिक सोपे झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:07 PM 19/Sep/2025