Ratnagiri: हातखंबा येथील उतार ठरतोय डेंजर स्पॉट!

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथील तीव्र उतार आणि चढावातील ते ठिकाण अतिशय धोकादायक झाले आहे. बुधवारी (ता. १७) तिथे पुन्हा भीषण अपघात झाला. एका तरुणाचा बळी गेला असून, आठ वाहनांचा चुराडा झाला. दैव बलवत्तर म्हणून काहीजण वाचले आहेत. ‘डेंजरस्पॉट’ रक्तरंजित झाल्यामुळे हातखंबावासियांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अपघातानंतर प्रशासन किंवा यंत्रणेला उपरती सुचणे हे दुर्दैवच; परंतु महामार्गावरील रखडलेले पुलाचे काम, गोव्याच्या दिशेने जाताना तीव्र उतारामुळे अवजड वाहनांवर नियंत्रण न राहणे आणि मुंबईच्या दिशेने जाताना असलेल्या चढावात अवजड वाहने रखडणे, अशा गंभीर समस्यांमुळे हा स्पॉट डेंजर झाला आहे.

यापूर्वीच्या अपघातानंतर रुंदीकरण झाले. आता या अपघातामुळे काय सुधारणा होणार, याकडे हातखंबावासियांचे लक्ष लागले आहे.
रत्नागिरी-मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरीनजीक असलेल्या हातखंबा येथील तीव्र उतार आणि चढावाचा भाग पुन्हा एकदा अपघातस्थळ बनला आहे. बुधवारी या धोकादायक वळणावर झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर सुमारे आठ वाहनांचे मोठे नुकसान झाले. या घटनेमुळे हातखंबावासियांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले असून, प्रशासनाच्या दुर्लक्षावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. महामार्गाचे चौपदरीकरण सुरू असतानाही हातखंबा येथील विशिष्ट भौगोलिक रचनेमुळे हा भाग वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. गोव्याच्या दिशेकडून येताना तीव्र उतार असल्यामुळे अवजड वाहनांना नियंत्रण मिळवणे कठीण होते तर मुंबईकडून जाताना असलेला तीव्र चढ चढताना हीच वाहने अडखळतात. बुधवारच्या अपघाताचे नेमके कारण हेच असल्याचे बोलले जात आहे.

स्थानिक ग्रामस्थांनी अनेक वर्षांपासून या धोकादायक स्थितीबद्दल प्रशासनाला वेळोवेळी सूचना दिल्या आहेत. यापूर्वीही याच ठिकाणी चालकाचे नियंत्रण सुटल्याने काही शिक्षकांच्या दुचाकी चिरडून जवळच्या दोन टपऱ्या ट्रकने उद्ध्वस्त केल्या होत्या. त्यानंतर तेथील अरुंद रस्त्याच्या बाजूची झाडे तोडून हा रस्ता रुंद करण्यात आला; परंतु देसाई हायस्कूल ते दर्गा या दरम्यान होणाऱ्या पुलाचे काम अनेक वर्षे रखडले आहे. पुलाचे काम लवकरात लवकर झाल्यानंतर हे सर्व प्रश्न सुटणार आहेत; परंतु ते काम कधी होणार, असा स्थानिकांचा प्रश्न आहे.

स्थानिकांनी सुचवलेले उपाय
स्थानिक ग्रामस्थ वारंवार होणाऱ्या अपघातामुळे त्रस्त आहेत. त्यांनी प्रशासनाला काही उपाय सुचवले आहेत. त्यापैकी एक म्हणजे वरती बॅरिकेडस् लावून एक पोलिस कर्मचारी ठेवावा आणि वाहनधारकांना सूचना देत वाहने सोडावीत किंवा छोटे गतिरोधक टाकावेत तसेच चढाव कमी करण्यासाठी भराव टाकून घ्यावा. तसे झाले तर अवजड वाहने अडखळणार नाहीत.

महामार्गाच्या कामामध्ये होणाऱ्या दिरंगाईमुळे हातखंबा येथील या डेंजरस्पॉटवर अपघात वाढत चालले आहेत. प्रशासन अजून किती लोकांचा जीव जाण्याची वाट पाहणार आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांमध्ये आहे. त्यामुळे लवकरात लवकर यामध्ये सुधारणा करावी. – रोहन जोशी, हातखंबा स्थानिक ग्रामस्थ

मुंबई-गोवा महामार्गावरच्या या भागात मागील वेळीही अपघात झाला होता. पाऊस किंवा अन्य कामांमुळे पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात होत आहेत. ग्रामस्थांनी काही पयार्य सुचवले आहेत. त्यावरही चर्चा केली आहे. या संदर्भात अधिकाऱ्यांची बैठक तातडीने बोलावली आहे. महामार्गाचे काम लवकर पूर्ण होईल, याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. – उदय सामंत, पालकमंत्री, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:09 19-09-2025