Ratnagiri : आंबा बागायतदार आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

रत्नागिरी : कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्था, शेतकरी आणि बागायतदार तसेच मच्छीमार व्यावसायिक व विविध सामाजिक संघटना यांच्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी मंगळवारी (ता. २३) सकाळी १० वा. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकणार आहे. कोकणातील शेतकरी २०१५ पासून निसर्गाच्या अवकृपेमुळे अडचणीत आला. त्यानंतर कोरोनाकाळात तो आर्थिक विवंचनेत सापडला. येथील बागायतदारांना शासनाने कर्जमाफीचे आश्वासन दिले होते; परंतु शेतकऱ्यांविषयी शासनाने कोणताही कर्जमाफीचा विचार केला नाही वा सहानुभूतीही दाखवली नाही. या मोर्चाचा उद्देश आंबा उत्पादक आणि शेतकऱ्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवणे हा आहे. २०१९ पासून आंब्याची खरेदी आणि बाजारपेठ व्यवस्था पूर्ववत करावी. सध्याच्या अनियमित पेमेंटमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ करावे तसेच आंब्याला चांगला भाव मिळावा यासाठी केंद्र सरकारने आधारभूत किंमत निश्चित करावी. फळपीक विमा योजना प्रभावीपणे राबवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी. कीटकनाशक आणि खतांच्या वाढलेल्या किमतीवर नियंत्रण ठेवावे आणि ती माफक दरात उपलब्ध करून द्यावी. कोणत्याही राष्ट्रीयीकृत विमा कंपनीने शेतकऱ्यांना योग्य विमा संरक्षण द्यावे. महावितरणने शेतकऱ्यांवर लादलेले स्मार्ट प्रीपेड मीटर तातडीने रद्द करावे, अशा अनेक मागण्यांचा समावेश आहे.

हे आंदोलन रत्नागिरी जिल्हा हापूस आंबा उत्पादक संघ, पावस परिसर आंबा उत्पादक संघ, मंगलमूर्ती आंबा उत्पादक संघ आडिवरे, रवळनाथ आंबा उत्पादक संघ करबुडे, अन्य सामाजिक आणि मच्छी उत्पादक संघटना, युनिटी ऑफ मूल निवासी समाज, ओबीसी संघर्ष समिती या संघटनांच्या नेतृत्वाखाली केले जाणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 AM 23/Sep/2025