रत्नागिरी : विविध कारणांमुळे घरातून बेपत्ता होणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्याचे आव्हान जिल्हा पोलिसांनी यशस्वीपणे पेलले आहे. ‘बेपत्तां’च्या शोधकार्यात जिल्ह्याने पोलिसदलाने संपूर्ण महाराष्ट्रात सरस कामगिरी नोंदवली आहे. जुलै २०२२ ते २०२५ या तीन वर्षांच्या कालावधीतील महिला, पुरुष, मुले-मुली असे २ हजार २१५ बेपत्ता झाले होते. त्यापैकी १ हजार ९९५ जणांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले. हे प्रमाण ९०.०७ टक्के आहे. अजून २२० बेपत्ता असून, त्यांचा शोध सुरू आहे.
बेपत्ता झाल्यानंतर नातेवाइकांची होणारी घालमेल शब्दांत मांडणे कठीण आहे. प्रत्येक दिवस शोधात आणि प्रतीक्षेत जातो. याच वेदना आणि आशेच्या धाग्याला पकडून रत्नागिरी पोलिसदलाने काम केले. जुलै २०२२ ते २०२५ या काळात अनेक महिला, पुरुष आणि अल्पवयीन मुले-मुली बेपत्ता झाले. पोलिसदलाने केवळ तक्रार दाखल न करता या प्रत्येक प्रकरणाला ‘माणुसकीच्या’ दृष्टिकोनातून पाहिले. बेपत्ता व्यक्तींना शोधून काढणे हे केवळ ड्यूटी नसून तुटलेल्या कुटुंबांना जोडणे आहे, ही भावना प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्याने जपली. बेपत्ता व्यक्तींचा जलद आणि प्रभावी शोध घेण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी ‘बेपत्ता नोंद कक्ष’ स्थापन केला आहे. हा कक्ष उपविभागीय स्तरावर विशेष सेल, जिल्हा स्तरावर पोलिस निरीक्षक आणि आवश्यक कर्मचारी यांच्या माध्यमातून अविरत काम करत आहे. या कक्षाच्या प्रभावी तपासकार्यामुळेच हे महत्त्वपूर्ण यश प्राप्त झालं आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये २ हजार २१५ बेपत्ता झाले. त्यापैकी १ हजार ९९५ जणांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले. हे प्रमाण ९०. ०७ टक्के आहे. अजून २२० बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:13 PM 27/Sep/2025














