रत्नागिरी : रत्नागिरी आगारासह विविध आगारात या पूर्वी स्मार्ट बसेस आल्यामुळे प्रवाशांना आरामदायी प्रवास मिळत आहे. जिल्हांतर्गत आणि जिल्हयाबाहेरील प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, रत्नागिरी आगारासाठी दिवाळीनंतर आणखी २५ स्मार्ट बसेस येणार आहेत. या बसेस आल्यास रत्नागिरीतील एसटी बससेवा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
रत्नागिरी विभागात शहरासह ग्रामीण भागातील १२ हून अधिक एसटी बसेस भंगारात गेल्यामुळे जिल्हा अंतर्गत एसटी बससेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे शालेय, महाविद्यालयीन, नोकरदार व सामान्य प्रवासी वैतागले आहेत.
रत्नागिरी आगारात गाड्यांची संख्या कमी पडत असल्यामुळे कित्येक फेऱ्या रद्द होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे प्रवाशांना तासनतास बसेसची वाट पाहावी लागत आहे. नाईलाजास्तव ग्रामीणच्या बसेस शहराला देण्यात आल्या असून बसेसची वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, रत्नागिरी आगारात आता नवीन बसेस येण्यास सुरुवात झाली आहे. रत्नागिरी आगारात पूर्वी १० स्मार्ट एसटी बसेस आल्यामुळे प्रवाशांना आरामदायी प्रवास मिळत आहे. त्या जिल्हांतर्गत धावत आहेत. तसेच रत्नागिरी विभागातील मंडणगड, लांजा, राजापूर, गुहागर, चिपळूण, संगमेश्वर, खेड, दापोली या आगारातही स्मार्ट बसेस आलेल्या आहेत. आता दिवाळीनंतर २५ स्मार्ट बसेस येणार आहेत. त्यामुळे रत्नागिरी आगारातील बससेवा पुन्हा सुरळीत होण्यास मदत मिळणार आहे.
सीएनजी बसेस, स्मार्ट बसेस आल्यास प्रश्न मिटणार
चिपळूणमध्ये प्रायोगिक तत्त्वावर जुन्याच बसेसचे सीएनजीमध्ये परिवर्तन करण्यात आले असून ते बसेस रस्त्यावर धावू लागल्या आहेत. याला यश आले असून रत्नागिरी आगारात तब्बल ६० सीएनजीचे बसेस लवकरच येणार आहेत. तसेच २५ स्मार्ट बसेस दिवाळीनंतर येणार आहेत. एकूण ८५ बसेस आल्यास रत्नागिरी आगारातील बससेवा सुरळीत होईल, वेळापत्रक ही कोलमडणार नाही.
रत्नागिरी आगारात पूर्वी १० नवीन बसेस आल्या होत्या. त्यांना प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. दिवाळीनंतर आणखी २५ स्मार्ट बसेस येणार आहेत. नवीन बसेस, सीएनजी बसेसही येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार नाही, वेळेत गाडया येतील. – प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
1:06 PM 30/Sep/2025














