मुंबई : शेतकऱ्यांसाठी पीक पाहणीची मुदत ३० सप्टेंबरला संपत असल्याने तिला एक महिना मुदतवाढ देण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केला. आता पीक पाहणी ३१ ऑक्टोबरपर्यंत केली जाईल.
राज्यात मोठ्या प्रमाणात झालेली अतिवृष्टी आणि दुबार पेरणी यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे यापूर्वी शेतकऱ्यांच्या पीक पाहणीसाठीचा कालावधी आधीच दोन आठवड्यांनी वाढवण्यात आला होता. आता त्याला एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली.
खरीप हंगाम २०२५ साठी सध्या शेतामध्ये पीक पाहणी होत असून दिनांक १ ऑगस्ट २०२५ ते १४ सप्टेंबर २०२५ या कालावधीत शेतकऱ्यांकडून व त्यानंतर दि. १५ सप्टेंबर २०२५ ते दि.२९ ऑक्टोबर २०२५ या कालावधीमध्ये सहाय्यक स्तरावरून पीक पाहणी करण्याचे निश्चित करण्यात आले होते. तथापि, शेतकऱ्यांना पीक पाहणीसाठीचा कालावधी दोन आठवडे वाढवून देण्यात आला आहे.
राज्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी तसेच, दुबार पेरणी यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे ही मुदतवाढ देणे आवश्यक होते. आता दिनांक ३० सप्टेंबरला शेतकऱ्यांची पिक पाहणीची मुदत संपत आहे. यानंतर उर्वरित एका महिन्यामध्ये सहाय्यकांच्याद्वारे उर्वरित सर्व शेतांची पीक पाहणी पूर्ण करणे आवश्यक आहे. याबाबत कृषि विभागाकडून निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयात याबाबत सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:28 01-10-2025














