महाविकास आघाडी काही तासात फुटणार; रामदास कदम यांचा खळबळजनक दावा

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या पाच वर्षांमध्ये एकाहून एक मोठे भूकंप घडले आहेत. त्यात राज्यातील दोन प्रमुख पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना फुटले.

सध्या जागा वाटपामध्ये महायुतीने आघाडी घेतली आहे. काही जागांवर मतभेद असले तरी ते सामोपचाराने सोडवण्याचे तंत्र आणि मंत्र त्यांनी अवलंबला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत जागा वाटपावरून तीव्र मतभेद समोर आलेले आहेत. आता अगदी थोड्याच वेळात महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा होणार असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे. पण त्यापूर्वीच शिवसेनेच्या एका जुन्या नेत्याने खळबळजनक दावा केला आहे. उध्दव ठाकरेंची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यातील प्रचंड मतभेदांमुळे काही तासांत महाविकास आघाडी तुटेल, असा गौप्यस्फोट कोकणातील या नेत्याने केला आहे.

रामदास कदम यांचा खळबळजनक दावा

उध्दव ठाकरेंची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यातील प्रचंड मतभेदांमुळे काही तासांत महाविकास आघाडी तुटेल असा खळबजनक दावा रामदास कदम यांनी केला आहे. उध्दव ठाकरे, नाना पटोले मुख्यमंत्री होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. त्यावरून दोघांमध्ये कलगीतुरा रंगल्याचा आरोप त्यांनी केला. शरद पवार हे दोन्ही पक्षांना संपवतील, असा दावा रामदास कदम यांनी केला आहे.

काही तासातच महाविकास आघाडी तुटणार

उध्दव ठाकरे पक्षप्रमुख असल्याचा आव आणतात. खरे पक्ष पक्ष प्रमुख असते तर शरद पवार यांच्या मांडीवर बसले नसते अशी बोचरी टीका रामदास कदम यांनी केली. बाळासाहेबांची स्टाईल उद्धव ठाकरे मारण्याचा प्रयत्न करतात. मुख्यमंत्री पदासाठी इकडे उद्धव ठाकरे गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत आणि तिकडे नाना पटोले गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या प्रचंड मोठे मतभेद झालेले आहेत. काही तासातच महाविकास आघाडी तुटल्याचे महाराष्ट्र बघेल, असा दावा त्यांनी केला.

थोड्याच वेळात महाविकास आघाडीची बैठक

दरम्यान आज महाविकास आघाडीचे नेते बाळासाहेब थोरात यांनी दिवसभर बैठकांचे सत्र सुरूच होते. नाना पटोले यांच्याशी खटल्याने महाविकास आघाडीतील समन्वयाची जबाबदारी थोरात यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. त्यांनी सकाळी महाविकास आघाडीतील जागा वाटपाविषयी शरद पवार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर सर्व काही अलबेल असल्याचा संदेश त्यांनी दिला. तसेच आता दुपारी महाविकास आघाडीची बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:39 22-10-2024