पावस ः रत्नागिरी तालुक्यातील नाखरे गावातील प्रत्येक घरात स्मार्ट मीटर बसवून १०० टक्के स्मार्ट मीटर गाव बनण्याचा मान नाखरेला मिळाला आहे. आता या गावातील रहिवाशांना महाराष्ट्र राज्य वीजवितरण कंपनी (एमएसईडीसीएल) कडून स्मार्ट मीटर वापरकर्त्यांना जाहीर केल्याप्रमाणे दिवसाच्या वेळेत स्वस्त दरात वीज मिळणार आहे. या यशस्वी उपक्रमाची दखल घेऊन नाखरे ग्रामपंचायतीच्या सरपंच विद्या जाधव यांचा वीज वितरण कंपनीतर्फे गौरव करण्यात आला.
कोकण विभागातील सर्व रहिवाशांनी स्मार्ट मीटरचा पर्याय स्वीकारलेले नाखरे हे पहिलेच गाव आहे. सरपंच जाधव यांनी गावात स्मार्ट मीटर बसवण्याला सक्रिय पाठिंबा दिला आणि परिणामी सुमारे ५०० रहिवाशांनी हा बदल स्वीकारला. आता सर्व वीजग्राहक मोबाईल ॲपद्वारे स्वतःचे वापर तपासू शकतात. तसेच ऑनलाईन बिल भरण्याची सुविधाही उपलब्ध झाली आहे.
२०१७-१८ मध्ये या गावाने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान जिल्हास्तरावर जिंकून ५ लाखांचा रोख पुरस्कार मिळवला. पुढच्या वर्षी पुन्हा या पुरस्कारासाठी ५० हजार रुपये मिळाले. २००७ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते निर्मल ग्रामपुरस्कार मिळाला. तत्कालीन राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पर्यावरण संतुलित समृद्ध ग्रामपुरस्कार मिळाला. गावाने रहिवाशांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठीही पुरस्कार मिळवले आहेत. आता १०० टक्के स्मार्ट मीटर बसवणे, हे या गावाच्या शिरपेचात आणखी एक मोठे यश आहे.
स्मार्ट मीटरच्या माध्यमातून ग्रामस्थांनी वीजवितरण कंपनीला चांगला प्रतिसाद दिला आहे; मात्र संबंधित कंपनीने बिलाची योग्य ती आकारणी करून दिलासा द्यावा, अन्यथा मोठ्या प्रमाणात वीजआकारणी केल्यास भविष्यात हा स्मार्ट मीटर त्यांना धोकादायक ठरू शकतो, याचा विचार संबंधित खात्याने करणे काळाची गरज ठरणार आहे.
– विजय चव्हाण, उपसरपंच, नाखरे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:25 04-10-2025














