Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’ची E-KYC सुलभ व सुकर होणार, OTP ची अडचण दूर करणार; मंत्री आदिती तटकरेंची माहिती

मुंबई : Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारला राज्यात पुन्हा सत्तेत आणण्यासाठी गेमचेंजर ठरली. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी महिलांना ईकेवायसी पूर्ण करावी लागणार आहे.

महिला व बालविकास विभागाकडून त्यासंदर्भातील पोर्टल विकसित करण्यात आलं आहे. या पोर्टलवर ईकेवायसी करताना ओटीपीबाबत तांत्रिक अडचणी महिलांना येत असल्याचं समोर आलं होतं. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्टकरुन ओटीपीबाबत येणाऱ्या अडचणींची बाब निदर्शनास आल्याचं सांगितलं. ईकेवायसीमधील तांत्रिक अडचणी दूर करण्यात येतील, असंही त्यांनी म्हटलं.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin E-KYC: आदिती तटकरे काय म्हणाल्या?

मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे E-KYC करताना OTP बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. महिला व बालविकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून, तज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपायोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन E-KYC प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होणार याबाबत मी सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त करते, असं आदिती तटकरेंनी म्हटलं.

लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थ्यांची संख्या आणखी घटणार?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. या ई केवायसी प्रक्रियेत या योजनेतील लाभार्थ्यांच्या सोबतच पती किंवा वडिलांची ई केवायसी करणं बंधनकारक करण्यात आलंय. महिला लाभार्थी सोबतच त्या महिलेचे पती किंवा वडिलांचेही वार्षिक उत्पन्न शोधलं जाणार आहे. लाभार्थी महिलेचं जर लग्न झालं असेल तर पतीचं आणि लग्न झालं नसेल तर वडिलांचं उत्पन्न शोधलं जाणार आहे.

लाभार्थी महिलेच्या उत्पन्नासह वडील किंवा पतीचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असल्यास अपात्र ठरवलं जाणार आहे. लाडकी बहीण योजनेसाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावा अशी मुख्य अट आहे. अनेक पात्र झालेल्या महिलांचे उत्पन्न कमी आहे मात्र लग्न झालं असेल तर पतीचं आणि लग्न झालं नसेल तर वडिलांचं उत्पन्न याचीही चौकशी केली जाणार आहे.याआधी लाभार्थी महिलांचं उत्पन्न शोधण्यात आल होत मात्र त्यात फार काही महिलांच उत्पन्न अडीच लाखांच्या वरती नव्हतं. त्यामुळे आता कुटूंबाच उत्पन्न शोधण्यासाठी पती किंवा वडिलांची ई केवायसी करावी लागणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:32 04-10-2025