Vijay Mallya: “माझ्याकडून पैसे मागणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे..” – विजय मल्ल्या

Vijay Mallya News: फरार उद्योगपती विजय मल्ल्यानं भारतीय बँकांवर संताप व्यक्त केला. त्यानं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर करत राग व्यक्त केलाय. आपल्या मालमत्ता विकून पैसे वसूल केले असले तरी भारतीय बँका अजूनही आपल्याकडून पैसे मागत आहेत, असं त्यानं म्हटलंय.

याशिवाय भारतीय अर्थ मंत्रालयानं या संदर्भात एक निवेदन देखील जारी केलं आहे, तरीही बँका अजूनही त्यांचा पाठलाग करत आहेत. ही मागणी आणि सुरू असलेली कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी, विजय मल्ल्यानं भारतातच प्रकरण मिटवण्याचा प्रस्तावदेखील मांडलाय.

विजय मल्ल्यानं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘भारतातील सरकारी बँकांनी, ज्या माझ्याकडे हमी (गॅरंटी) म्हणून पैशांची मागणी करत आहेत, त्यांना लाज वाटली पाहिजे. या बँकांनी आजपर्यंत वसुलीचा योग्य अहवालही दिला नाही. दुसरीकडे, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, आतापर्यंत या सरकारी बँकांना १४,१०० कोटी रुपये परत मिळाले आहेत.” मल्ल्यानं आणखी एका पोस्टमध्ये लिहिलंय की, ‘जोपर्यंत भारतातील सरकारी बँका स्वतः स्वच्छ होत नाहीत, तोपर्यंत मी इंग्लंडमध्ये कायदेशीर कारवाई करणार नाही. माझ्याकडे एक चांगला प्रस्ताव आहे, जो केवळ भारतातच निकाली काढता येऊ शकतो.’

ब्रिटनच्या कोर्टातून अर्ज घेतला परत

तत्पूर्वी, सोमवारी विजय मल्ल्यानं फसवणूक आणि मनी लाँड्रिंग प्रकरणांमध्ये सुनावणी होण्यापूर्वी, ब्रिटनच्या न्यायालयातील दिवाळखोरीचा आदेश रद्द करण्याच्या अपीलाचा आपला अर्ज परत घेतला. याचा अर्थ असा आहे की, दिवाळखोर व्यक्तींच्या प्रकरणांची सुनावणी करणारे ‘ट्रस्टी इन बँकरप्सी’ हे भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) नेतृत्वाखालील बँकांच्या समूहाला, मल्ल्याच्या आता बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाईन्सवरील अंदाजे १.०५ अब्ज पाउंडच्या कर्जाच्या पेमेंटमध्ये मदत करण्यासाठी मालमत्तांचा शोध घेणं सुरू ठेवू शकतील.

मल्ल्याच्या यांच्या मालमत्तांवर आजही लक्ष

बँकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ब्रिटनच्या टीएलटी एलएलपी (TLT LLP) या कंपनीनं सांगितलं की, विजय मल्ल्याच्या प्रकरणात ‘ट्रस्टी इन बँकरप्सी’ आता कोणत्याही अडथळ्याशिवाय, त्यांच्या दिवाळखोरीच्या स्थितीनुसार येणाऱ्या मालमत्तांची तपासणी आणि ती जारी करण्याचं काम सुरू ठेवू शकतील. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अँथनी मान यांनी बँकांच्या बाजूनं दिलेल्या चार वर्षांहून अधिक जुन्या दिवाळखोरी आणि कर्ज शोधन आदेशाला कायम ठेवण्याच्या निर्णयानंतर हे घडलं आहे.

किती झाली वसुली

विजय मल्ल्या याच्यावर सुमारे ९ हजार कोटी रुपयांच्या हेराफेरीच्या प्रकरणात आरोप ठेवण्यात आले होते. सध्या विजय मल्ल्यानं दावा केलाय की, आतापर्यंत सरकारी बँकांनी त्याची मालमत्ता विकून १४,१०० कोटी रुपयांहून अधिकची वसुली केली आहे. मल्ल्या यांनी हा देखील दावा केला आहे की, डेट रिकव्हरी ट्रिब्युनलनं केवळ ६,२०३ कोटी रुपयांच्या वसुलीचाच आदेश दिला होता, तर बँकांनी आजपर्यंत यापेक्षा दुप्पट रक्कम वसूल केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:44 14-10-2025