रत्नागिरी : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत सुरू असलेल्या विविध अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठाने प्रवेशाची शेवटची मुदत जाहीर केली आहे. १५ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. जिल्ह्यातील सर्व अभ्यासकेंद्रांना संपर्क साधून पदवी, पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्याचे आवाहन विद्यापीठाने केले आहे.
पत्रकारिता क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पत्रकारिता पदविका हा उपयुक्त अभ्यासक्रम असून, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांसाठी मानवी हक्क शिक्षणक्रम हा कोर्स उपयुक्त आहे. या दोन्हीं अभ्यासक्रमांचे प्रवेश रत्नागिरीतील विद्यापीठाचे अधिकृत अभ्यासकेंद्र ‘रत्नभूमी जर्नालिझम इन्स्टिट्यूट’ येथे सुरू आहेत.
पत्रकारिता पदविका आणि मानवी हक्क शिक्षणक्रम या दोन्ही अभ्यासक्रमांच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पत्रकारिता पदविका अभ्यासक्रमासाठी १२ वी उत्तीर्ण, १२ वी समकक्ष कोणताही शासनमान्य कोर्स किंवा मुक्त विद्यापीठाचा पूर्वतयारी अभ्यासक्रम उत्तीर्ण असलेले विद्यार्थी पात्र ठरतील.
मानवी हक्क शिक्षणक्रमासाठी १० वी उत्तीर्ण, १० वी समकक्ष शासनमान्य कोर्स किंवा मुक्त विद्यापीठाचा पूर्वतयारी अभ्यासक्रम उत्तीर्ण असलेले विद्यार्थी पात्र ठरणार आहेत, असे कळवण्यात आले आहे.बी.एड. करणाऱ्या विद्याथ्यर्थ्यांना हे दोन्ही कोर्स पूर्ण केल्यानंतर सात गुणांचा भारांक मिळणार आहे.
तरी या दोन्ही अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी मुक्त विद्यापीठाचे अधिकृत अभ्यासकेंद्र रत्नभूमी जर्नालिझम इन्स्टिट्यूट, ३/२०८, रत्नभूमी बिल्डिंग, पत्रकार कॉलनी, रेल्वे स्टेशनसमोर, कुवारबाव, रत्नागिरी येथे संपर्क साधावा. असे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 AM 15/Oct/2025














