रत्नागिरी : भारतात तंबाखूचा वापर हा प्रतिबंधात्मक आजार आणि मृत्यूंचे एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे केंद्र सरकारने यावर्षीही दि. ९ ऑक्टोबर २०२५ पासून ६० दिवसांचे तंबाखूमुक्त युवा अभियान ३.० राबविण्यास सुरुवात केली आहे. भारतातील तरुणांना तंबाखूचा वापर रोखण्यासाठी किंवा सोडण्यासाठी शिक्षित करणे आणि सक्षम करणे आहे, हा या मोहिमेमागचा उद्देश आहे. या मोहिमेला जिल्ह्यातही प्रारंभ करण्यात आला असून, या कालावधीत जनजागृती राबविण्यात येणार आहे.
भारतात तंबाखू सेवनामुळे दरवर्षी १३.५ लाख मृत्यू होतात. तंबाखूचा वापर लहान वयातच सुरू झाल्याने युवा पिढीचे आरोग्य धोक्यात आले आहे. तंबाखूमुक्त पिढीच्या दृष्टिकोनानुसार, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (MoHFW) २०२३ पासून वार्षिक तंबाखूमुक्त युवा मोहीम (TFYC) संस्थानिहाय राबविण्यास सुरवात केलेली आहे. या मोहिमेच्या दोन यशस्वी फेऱ्या २०२३ आणि २०२४ साली पार पडल्या आहेत. यात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा सक्रिय सहभाग होता.
गेल्या वर्षीच्या मोहिमेच्या यशावर आधारित, यावर्षी ही दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ पासून ६० दिवसांचे तंबाखूमुक्त युवा अभियान ३.० राबविण्याचे केंद्र शासनाने आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. सामाजिक संस्थांच्या सहभागातून तंबाखूच्या हानिकारक परिणामांबद्दल जनजागृती वाढवणे. तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था अभियान राबविणे, तंबाखूमुक्त गावे घोषित करणे. COTPA २००३ आणि PECA २०१९ या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे. सोशल मीडिया सहभाग वाढवणे, क्षमता बांधणी (सरकारी अधिकाऱ्यांचा सहभाग) करणे आदी प्रमुख उपक्रम राबविण्यात येणार आहे.
जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली मोहिमेचा शुभारंभ झाला असून, युवा सहभागातून मॅरेथॉन, सायकल रॅली इ.चे आयोजन करण्यात येणार आहे. या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:50 PM 15/Oct/2025














