संगमेश्वर : संगमेश्वर आणि लांजा तालुक्यात एकाही जिल्हा परिषद गटात इतर मागास वर्ग (ओबीसी) आरक्षण पडलेले नाही. हा या दोन्ही तालुक्यांतील कुणबी-ओबीसी समाजावर मोठा अन्याय आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जाहीर केलेली गट आरक्षण सोडत रद्द करावी आणि जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये ओबीसी समाजाला समान प्रतिनिधित्व मिळेल असे नियोजन करावे, असे गावविकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड यांनी सांगितले.
जिल्हा परिषद गट आरक्षण सोडतीबाबत गोताड म्हणाले, ही संपूर्ण सोडत प्रक्रिया तातडीने रद्द करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. आरक्षण सोडतीमुळे संगमेश्वर आणि लांजा या दोन महत्त्वाच्या तालुक्यातील इतर मागास वर्गातील कुणबी समाजाला राजकीय प्रतिनिधित्वापासून वंचित राहावे लागत आहे. संगमेश्वर आणि लांजा तालुक्यात ओबीसी समाजाची मोठी संख्या असूनही आरक्षणाच्या सोडतीत त्यांच्या वाट्याला एकही गट आलेला नाही. हा समाजावर झालेला अन्याय आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची गट आरक्षण सोडत त्वरित रद्द करून नव्याने आणि न्याय्य पद्धतीने आरक्षण सोडत जाहीर करावी, जेणेकरून ओबीसी समाजाला प्रतिनिधित्वाची संधी मिळेल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:52 PM 16/Oct/2025














