उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ब्रह्मोस एरोस्पेस युनिटमधून सुपरसॉनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्रांच्या पहिल्या बॅचला हिरवा झेंडा दाखवला.
याच दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला कडक इशाराही दिला. हे तेच युनिट आहे ज्याची पायाभरणी डिसेंबर २०२१ मध्ये झाली होती आणि ज्याचं औपचारिक उद्घाटन ११ मे २०२५ रोजी झालं होतं.
फक्त पाच महिन्यांत युनिटने पहिले उत्पादन पूर्ण केलं, ज्यामुळे भारताच्या संरक्षण उत्पादन क्षेत्रात एक नवीन विक्रम प्रस्थापित झाला. युनिटचं दरवर्षी ८० ते १०० ब्रह्मोस क्षेपणास्त्रांचं उत्पादन करण्याचं उद्दिष्ट आहे. हा प्रकल्प उत्तर प्रदेश संरक्षण औद्योगिक कॉरिडॉरच्या सहा नोड्सपैकी एक आहे, जो विशेषतः लखनौमध्ये विकसित करण्यात आला आहे.
“भारताच्या वाढत्या स्वदेशी लष्करी क्षमतेचं प्रतीक”
कार्यक्रमात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, “ब्रह्मोस आता फक्त एक क्षेपणास्त्र राहिलेलं नाही, तर ते भारताच्या वाढत्या स्वदेशी लष्करी क्षमतेचं प्रतीक आहे. पारंपारिक वॉरहेड, एडवान्स गायडन्स सिस्टम आणि सुपरसॉनिक स्पी़ड यांचं कॉम्बिनेशनमुळे ते जगातील सर्वोत्तम क्षेपणास्त्रांपैकी एक आहे. ब्रह्मोस आता लष्कर, नौदल आणि हवाई दलाचा कणा बनला आहे. ब्रह्मोस हे नाव देशातील नागरिकांमध्ये विश्वास आणि अभिमानाची भावना निर्माण करते.”
“ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक ट्रेलर”
“लखनौमध्ये ब्रह्मोस युनिटची स्थापना हा पुरावा आहे की, भारत आता फक्त ग्राहक नाही तर संरक्षण तंत्रज्ञानाचा उत्पादक आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये ब्रह्मोसच्या यशाने हे सिद्ध केलं की, आमची क्षेपणास्त्रे केवळ एक चाचणी नाही तर ताकदीचा व्यावहारिक पुरावा आहे. ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक ट्रेलर होता. आता पाकिस्तानची एक-एक इंच जमीन ब्रह्मोसच्या रेंजमध्ये आहे. भारतासाठी विजय ही एक घटना नाही, तर एक सवय आहे, जी आम्हाला आणखी मजबूत करायला पाहिजे.”
शेकडो तरुणांना रोजगार
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, लखनौमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्राचे उत्पादन हे केवळ लष्करी कामगिरी नाही तर उत्तर प्रदेशच्या औद्योगिक विकासाचं एक उदाहरण आहे. लखनौ आता केवळ संस्कृतीचे शहर नाही तर तंत्रज्ञानाचं शहर आहे. ब्रह्मोस युनिटने केवळ देशाची सुरक्षा मजबूत केली नाही तर शेकडो तरुणांना रोजगारही दिला आहे. ब्रह्मोस युनिटने ४० कोटींचा जीएसटी महसूल निर्माण केला आहे आणि येत्या काळात हा आकडा २०० कोटींपर्यंत पोहोचू शकतो.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:20 18-10-2025














