Climate Change : यंदा दिवळीनंतर गुलाबी थंडी..

Climate change : मान्सून परतीच्या वाटेवर असला तरी अद्यापपर्यंत जिल्ह्यात गुलाबी थंडीची चाहूल लागलेली नाही. रात्रीच्या तापमानात काही प्रमाणात घसरणही होत आहे; मात्र दिवसा उकाडा अजूनही जाणवत आहे.

यंदा पावसाळा लांबल्यामुळे थंडीचेही आगमन जरा उशिराच होणार असून, दिवाळीनंतरच गुलाबी थंडीचा अनुभव घेता येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

गेल्या काही वर्षांपासून हवामानात होत असलेल्या बदलामुळे उन्हाळा, हिवाळा व पावसाळा या तीनही ऋतूंवर परिणाम होत आहे. यंदाही पावसाळ्याचे आगमन १५ जूननंतरच झाले आहे, तर मान्सूनची माघार देखील उशिराने होण्याची शक्यता आहे.

त्यातच ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची शक्यता निर्माण झाली आहे. या वादळामुळेही राज्यात पुन्हा पावसाचाही अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. त्यातच अजूनही अरबी समुद्रात व बंगालच्या उपसागरात देखील कमी दाबाचे क्षेत्र विकसित होत असल्याने हवेत बाष्पाचे प्रमाण देखील कायम आहे.

त्यामुळे ढगाळ वातावरण दिसून येत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना दक्षिणेकडे येण्यासाठीची पोषक परिस्थिती निर्माण होत नसल्याने यंदा थंडीचे आगमन उशिराच वातावरण देखील कायम आहे. त्यामुळे थंडीसाठी पोषक वातावरण सध्या तरी निर्माण होताना दिसत नाही. नोव्हेंबर महिन्यात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे.

हवामान बदलाचा परिणाम

हवामान बदलाचा परिणाम अद्याप थंडीसाठी पोषक स्थिती निर्माण झालेली नाही. त्यात मान्सून परतीच्या वाटेवर आहे. त्यामुळे अजून काही दिवस तरी थंडीचे आगमन जिल्ह्यात होण्याची शक्यता कमीच आहे. हवामान बदलामुळे हे परिणाम होत आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात थंडीचे आगमन होऊ शकते. – डॉ. पंडित वासरे हवामान तज्ज्ञ.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:08 23-10-2024