राजापूर : कार्तिकी एकादशीनिमित्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी राजापूर तालुक्यातून पंढरपूरकडे वारकरी दिंड्या मार्गस्थ होऊ लागल्या आहेत. हाती भगवी पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन आणि मुखी जय हरी विठ्ठल, असा जयघोष करत वारकरी पायी दिंडीने श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेने पुढे सरकू लागले आहेत.
एकादशीनिमित्ताने श्री विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे दरवर्षी राजापूर तालुक्यातून मोठ्या संख्येने वारकरी जातात. त्याप्रमाणे यावर्षीही शीळ, उन्हाळे, कोदवली, ताम्हाणे, दोनिवडे, सौंदळ, ओझर, पडवे, तुळसवडे, आंगले, खरवते, पाचल, भालावली, गोवळ, वाटूळ आदी परिसरातील वारकरी पंढरपूरला जात आहेत. एसटीसह काही खासगी गाड्यांनी पंढरपूर येथे पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांव्यतिरिक्त तालुक्यातून काही पायी दिंड्याही निघालेल्या आहेत. त्यामध्ये वाटूळ येथील वारकऱ्यांच्या पायी दिंडीचा समावेश आहे. हाती भगवी पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन आणि मुखी जय हरी विठ्ठलऽऽ असा जयघोष करत या दिंड्या रवाना झाल्या आहेत. दरमजल करत या दिंड्या कार्तिकी एकादशीपर्यंत पंढरपूरला पोचतील. टाळमृदंगाच्या साथीने भजन-कीर्तनाद्वारे साऱ्यांना प्रबोधनात्मक संदेश या दिंडीतून पोहोचवण्याचे काम वारकरी करत आहेत.
दरम्यान, गेले काही दिवस सर्वत्र पाऊस पडत आहे; परंतु विठ्ठलाच्या ओढीपुढे निसर्गाचेही चालत नाही, हे वारीत सहभागी झालेल्यांच्या उत्साहावरून दिसून येते. वातावरणातील या बदलांवर मात करत मोठ्या उत्साहात वारकरी यामध्ये सहभागी झाले आहेत.
५२ एसटी बसचे नियोजन
राजापूर तालुक्यातील आगारातून ५२ एसटी गाड्यांचे आरक्षण वारकऱ्यांसाठी केल्याची माहिती आगार प्रशासनाकडून देण्यात आली. येत्या दोन दिवसांमध्ये या गाड्यांमधून टप्प्याटप्प्याने पंढरपूरला रवाना होणार आहेत. त्याबाबतचे नियोजनही वारकऱ्यांसह आगार प्रशासनाने केले आहे. या गाड्यांमधून दोन हजाराहून अधिक वारकरी पंढरपूरला जातील, असा अंदाज आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:45 28-10-2025












