Narendra Modi Slams Congress : आज सरदार वल्लभभाई पटेल यांची 150वी जयंती आहे. आजचा दिवस राष्ट्रीय एकतादिन म्हणून साजरा केला जातोय. या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.
“काँग्रेसच्या चुकीमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानकडे गेला. काँग्रेसनं वेगळं संविधान तयार करुन कश्मीरला देशापासून वेगळं केलं,” असा आरोप पीएम मोदींनी केला.
मोदी पुढे म्हणाले, “सरदार पटेलांना इतिहास लिहिण्यात वेळ घालवायचा नव्हता, ते इतिहास घडविण्यात विश्वास ठेवायचे. त्यांनी देशाच्या एकतेसाठी जे कार्य केलं ते अद्वितीय आहे. आज कश्मीर अनुच्छेद 370 च्या बेड्यांतून मुक्त होऊन मुख्य प्रवाहात सामील झाला आहे. ऑपरेशन सिंदूरनं जगाला दाखवून दिलं की, भारतावर नजर टाकणाऱ्याला भारत आता घरात घुसून मारतो. प्रत्येकवेळी भारताचं प्रत्युत्तर अधिक ठोस आणि निर्णायक असतं.”
काँग्रेसने देशाची सार्वभौमता दुर्लक्षित केली
“सरदार पटेलांनी देशाची सार्वभौमता सर्वोच्च मानली, पण त्यांच्या निधनानंतर तत्कालीन सरकारांनी त्या बाबतीत गंभीरता दाखवली नाही. कश्मीरमधील चुकीचे निर्णय, ईशान्य भारतातील समस्या, नक्षलवाद-माओवादी हिंसा या सर्वांनी देशाच्या अखंडतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. पण त्या काळातील सरकारांनी ठोस भूमिका घेतली नाही, परिणामी देशानं रक्तपात आणि हिंसाचार भोगला.”
घुसखोर देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका
“सरदार पटेल जसे इतर संस्थानांचे विलय करण्यात यशस्वी झाले, तसेच कश्मीरचे पूर्ण विलय व्हावे अशी त्यांची इच्छा होती, पण नेहरूंनी ती इच्छा पूर्ण होऊ दिली नाही. काँग्रेसनं कश्मीरला स्वतंत्र संविधान आणि स्वतंत्र झेंडा देऊन देशापासून वेगळं केलं. त्या चुकीच्या निर्णयाची आग देशाने अनेक दशके भोगली. देशाच्या एकतेला आणि अंतर्गत सुरक्षेला सर्वात मोठा धोका हा घुसखोरांकडून आहे. अनेक दशकांपासून परदेशी घुसखोर देशात येत राहिले, त्यांनी संसाधनांवर कब्जा केला, लोकसंख्येचं संतुलन बिघडवलं आणि देशाच्या एकतेवर परिणाम केला. पण पूर्वीच्या सरकारांनी या समस्येकडे डोळेझाक केली. मतांच्या राजकारणासाठी त्यांनी राष्ट्राच्या सुरक्षेला धोक्यात घातलं,” अशी घणाघाती टीकाही पंतप्रधान मोदींनी यावेळी केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 31-10-2025














