रत्नागिरी : ज्येष्ठ कादंबरीकार, संपादक, कवी आणि तत्त्वज्ञ बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी १८७५ ला लिहिलेल्या ‘वंदे मातरम्’ या भारतमातेच्या गौरवगीताला येत्या ७ नोव्हेंबर रोजी १५० वर्षे पूर्ण होत आहेत. भारतीयांच्या मनात राष्ट्रभावना जागृत करण्यात मोलाचा वाटा असलेल्या या गीताचा वर्धापन दिन धुमधडाक्यात साजरा केला पाहिजे. ‘वंदे मातरम्’ या स्तुतीगीताला दीडशे वर्षे पूर्ण होत असल्याने शाळा, महाविद्यालये, संस्थांमध्ये व्यापक कार्यक्रमांचे नियोजन करून स्मृती जागवूया, असे प्रतिपादन रत्नागिरी शिक्षणसंस्थेचे उपाध्यक्ष अॅड. विलास पाटणे यांनी केले.
ते म्हणाले, वंदे मातरम् राष्ट्रीय अस्मितेचं प्रतीक आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या ‘आनंदमठ’ या कादंबरीला आणि त्यातील ‘वंदे मातरम्’ या गीताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. १८८२ मध्ये प्रकाशित झालेली ही बंगाली कादंबरीतील ‘वंदे मातरम्’ हे गीत देशभक्ती आणि राष्ट्रीय अस्मितेचं प्रतीक आहे.
बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी १८७०च्या सुमारास रचलेलं ‘वंदे मातरम्’ हे गीत ‘आनंदमठ’ या कादंबरीत क्रांतिकारकांचं युद्धगीत म्हणून समाविष्ट केले गेले. मातृभूमीला अभिवादन करून तिची स्तुती करणारं हे गीत पुढे स्वातंत्र्य चळवळीचा आत्मा बनले. १९०५च्या बंगाल फाळणीविरोधी आंदोलनात या गीतानं स्वातंत्र्यसैनिकांना प्रेरणा दिली. काँग्रेसच्या अधिवेशनांमध्येही हे गीत गायले गेले
होते.
२६ जून १८३८ रोजी कोलकाताजवळील नहाटी इथे जन्मलेलं बंकिमचंद्र चट्टोपाध्याय हे आधुनिक भारतीय साहित्यातील अग्रणी कादंबरीकार होते. १८५८ मध्ये कोलकाता विद्यापीठाचे पहिले पदवीधर होऊन त्यांनी सरकारी नोकरी स्वीकारली. ‘राजमोहन्स वाइफ’ ही त्यांची पहिली इंग्रजी कादंबरी तर ‘दुर्गेशनंदिनी’, ‘कपालकुंडला’, ‘मृणालिनी’, ‘विषवृक्ष’, ‘इंदिरा’, ‘चंद्रशेखर’, ‘राजसिंह’ आणि ‘आनंदमठ’ या बंगाली कादंबऱ्यांनी त्यांना ख्याती मिळवून दिली. ‘बंगदर्शन’ नियतकालिकाचे संपादन करत त्यांनी वैचारिक लेखनाला चालना दिली. बंगाली साहित्याला समृद्ध करणाऱ्या बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचं १८९४ मध्ये निधन झाले. वंदे मातरम्च्या स्मृती जागवणे आवश्यक आहे, असे अॅड. पाटणे म्हणाले.
गीताने क्रांतिकारी बदल
मातृभूमीला देवीच्या रूपात चित्रित करणाऱ्या या गीताने भारतीय अस्मितेचा उद्घोष केला. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या या साहित्यकृतीनं तत्कालीन सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत क्रांतिकारी बदल घडवले. आजही ‘वंदे मातरम्’ ऐकताना प्रत्येक भारतीयाच्या मनात देशप्रेमाची ज्योत प्रज्वलित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:35 PM 01/Nov/2025














