Nitesh Rane : कोणी आम्हाला हलक्यात घेऊ नये, नितेश राणे यांचा इशारा

रत्नागिरी : रत्नागिरीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्याला कमी न लेखता सन्मानपूर्वक युती झाली तर सगळे समाधानी आहेत. नाही झाली तर भाजपचा कार्यकर्ता सक्षम आहे. कोणी आम्हाला हलक्यात घेऊ नये आणि काेणी कमीही लेखू नये, असा टाेला मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी बाेलताना पालकमंत्री सामंत यांना लगावला.

एका कार्यक्रमानिमित्ताने मंत्री नितेश राणे रविवारी रत्नागिरीत आले हाेते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रत्नागिरीतील महायुतीबाबत स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीमध्ये आमच्या कार्यकर्त्याने भरपूर काम केले आहे. त्यामुळे कार्यकर्त्याला आता अपेक्षा आहेत.

काेणी आम्हाला कमी लेखू नये आणि कोणी आम्हाला हलक्यातही घेऊ नये, तसेच आम्हाला सुक्या धमक्याही देऊ नयेत, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. कार्यकर्ते जर काही बाेलत असतील तर त्याची पक्षश्रेष्ठी दखल घेतील, असेही मंत्री नितेश राणे म्हणाले.

कार्यकर्त्याला सन्मानजनक वागणूक मिळते का नाही? हे पाहणं भाजपचा कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी आहे. भाजपच्या कार्यकर्त्याला मानसन्मान मिळावा म्हणून आम्ही बोलतो… पुढच्या काही दिवसांमध्ये काय होतं ते पाहू, असेही ते म्हणाले. काही दिवस थांबा, काळजी करू नका, असे ते कणकवलीतील वादावर म्हणाले.

नोटीस हातात आलेली नाही

अल्पसंख्याक आयोगाची नोटीस माझ्या हातात आलेली नाही. त्यांनी त्यांचे काम करावे, मी माझे काम करत राहणार, असेही ते म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:56 10-11-2025