चिपळूण : गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील कुंभार्ली घाटरस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. अवजड वाहतुकीची वाहने कधी घाटातील रस्त्यावर कोसळत आहेत तर कधी दरीत कोसळत आहेत. त्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभाग खड्डे भरण्याकडे दुर्लक्ष करत आहे.
कुंभार्ली घाटातून रत्नागिरी जिल्ह्यात लागणारा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जातो. कर्नाटकातील बेळगाव, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात जाणारी एसटीची वाहतूक याच घाटातून होते. येथील शासकीय कार्यालयात कार्यरत असलेले अनेक कर्मचारी, अधिकारी याच घाटमार्गे जिल्ह्यात येतात. खेड, चिपळूण तालुक्यातील औद्योगिक वसाहतीमधून तयार होणारे उत्पादन या घाटमार्गे पश्चिम महाराष्ट्रात पाठवले जाते. सध्या आंबाघाटाचे काम सुरू आहे. त्यामुळे मागील वर्षापासून बेळगाव आणि पश्चिम महाराष्ट्रात जाणारी बहुतांशी अवजड मालाची वाहने या घाटमार्गे जात आहेत. पावसाळ्यात घाटरस्त्याची दुरुस्ती झाली नाही त्यामुळे पावसाचे चार महिने त्रासाचे गेले. त्यानंतरही घाटरस्त्याच्या दुरुस्तीला बांधकाम विभागाला वेळ मिळत नाही. गेल्या आठवड्यात सिमेंटची वाहतूक करणाऱ्या ट्रक दरीत कोसळला. गुरूवारी (ता. ६) घाटातील प्रचंड मोठ्या खड्ड्यात आदळून किराणामालाची वाहतूक करणारा ट्रक उलटला. हा ट्रक बाजूला करताना वाहतूककोंडी झाली. त्यानंतर मोटारवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक पवार यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली.
घाटात रस्त्यावर जागोजागी झाडेझुडपे वाढली आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूने समोरून येणारी वाहने दिसत नाहीत. त्यामुळे अपघात वाढत आहेत. पावसाळ्यात कोसळलेल्या दरडी अजून बाजूला केलेल्या नाहीत. घाटरस्त्याच्या दुरुस्तीबाबत कोणी लोकप्रतिनिधी आवाज उठवत नाही. –बबन खरात, ग्रामस्थ, धनगरवाडी-पोफळी
गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर खड्डे पडले आहेत, ते बुजवण्याची सूचना आम्ही ठेकेदाराला केली आहे. पाऊसही गेला आहे. ठेकेदाराने अजून खड्डे भरायचे काम का सुरू केले नाही, याची चौकशी करून त्याला सक्त ताकीद दिली जाईल.
अरुण मुलाजकर, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, चिपळूण
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:24 12-11-2025














