पावस बाजारपेठ रस्त्याची दयनीय अवस्था

गावखडी : नावलौकिक अशा स्वामी स्वरूपानंद अश्या पवित्र भूमीतील पावस गावातील रस्त्याची अवस्था खूपच दयनीय व बिकट झाली असून वाहन चालकांना प्रवास करताना मोठी डोकेदुखी झाली आहे. त्या रस्त्यावर भलेमोठे खड्डे पडले असल्याने प्रवाशांची मान व कंबर दुखी असे आजार मोठ्या प्रमाणात होत आहेत. याची दखल जिल्हा परिषद बांधकाम विभाग रत्नागिरी यांनी त्वरित घेण्यात यावी, अन्यथा त्यांच्या कार्यालयावर आठ दिवसाच्या आत धडक देण्याचा इशारा राष्ट्रवादीचे पावस विभाग अध्यक्ष संतोष पोकडे यांनी दिला आहे.

बाजारपेठेतील हा रस्ता अत्यंत खराब व निकृष्ट झाला असून भले मोठे खड्डे पडले आहेत या रस्त्यावर बांधकाम विभागाचे कर्मचारी नेहमी प्रवास करत असताना सुद्धा त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधून फिरत असल्यागत वावरत आहेत त्यांच्या नाकर्तेपणामुळे पावस विभागातील प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पावस गाव पर्यटन म्हणून घोषित असून या विभागावर नेहमीच संबंधित विभागाची जाणून बुजून उदासीनता दिसून येत आहे. सबब यात बांधकाम विभागाने त्वरित लक्ष घालून रस्त्यावरील खड्डे भरून रस्ता प्रवाशांसाठी सुखकर करावा, अन्यथा जिल्हा परिषद बांधकाम विभागावर ग्रामस्थांसह कार्यालयावर धडकणार असल्याचा इशारा संतोष पोकडे यांनी दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:02 25-10-2024