Indigo च्या CEO नी बैठकीत मंत्र्यांसमोर हात जोडले; सरकारनं आदेश काढले

नवी दिल्ली: इंडिगो एअरलाईन्सचे सीईओ पीटर एल्बर्स यांना मंगळवारी नागरी उड्डाण मंत्रालयाच्या मुख्यालयात बोलावण्यात आलं. या बैठकीला नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू आणि या विभागाचे सचिव समीर सिन्हा उपस्थित होते.

इंडिगोनं गेल्या आठवड्याभरात शेकडो विमानांची उड्डाणं रद्द केली आहेत. त्यामुळे हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. याच पार्श्वभूमीवर इंडिगोच्या सीईओंना नागरी उड्डाण मंत्रालयाच्या मुख्यालयात बोलावण्यात आलं होतं.

इंडिगोच्या विमानांची सद्यस्थिती, प्रवाशांच्या अडचणी, रिफंडची स्थिती, पायलट आणि क्रू रोस्टरची स्थिती, प्रवाशांचं सामान परत करण्याबद्दल या बैठकीत चर्चा झाली. इंडिगोच्या अनेक विमानांच्या फेऱ्या सध्या रद्द होत आहेत. हेच कॅन्सलेशन कमी करण्यासाठी इंडिगोला ऑपरेशन्स १० टक्क्यांनी कमी करण्याचा आदेश हवाई वाहतूक मंत्रालयानं विमान कंपनीच्या सीईओला दिले आहेत. मंत्री नायडू यांच्या सोबत झालेल्या बैठकीत इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स हात जोडून बसलेले दिसले.

उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांच्या सोबत्या बैठकीआधी इंडिगो कंपनीनं मंगळवारी महत्त्वाची घोषणा केली. आठवड्याभरापेक्षा अधिक दिवस सुरु असलेलं संकट संपलं असून आता सगळी उड्डाणं नेहमीप्रमाणे सुरु झाल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं. कंपनीचा ऑन टाईम परफॉर्मन्स रुळावर येत असून बुधवारपासून जवळपास १९०० उड्डाणं सुरु करण्याची योजना असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं. इंडिगोचं हवाई वाहतूक क्षेत्रावर मोठं वर्चस्व आहे. कंपनीनं ६५ टक्के बाजारपेठ काबीज केली आहे.

नेटवर्कमध्ये सातत्यानं सुधारणा होत आहेत. त्यामुळे सगळी उड्डाणं लवकरच पूर्वपदावर येतील, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. ‘विमानतळावर अडकलेल्या जवळपास सगळ्या प्रवाशांचं सामान त्यांच्याकडे पोहोचलेलं आहे. काही प्रवाशांना अद्याप त्यांचं सामान मिळालेलं नाही. ते लवकरच त्यांच्यापर्यंत पोहोचेल. सध्याच्या घडीला कंपनी १३८ स्टेशनवर १८०० हून अधिक उड्डाणं पूर्ण करत आहे. कंपनीनं ग्राहकांसाठी तिकीट रद्द करण्याची आणि रिफंड मिळवण्याची प्रक्रिया सोपी केली आहे. वेबसाईटवरुन ही प्रक्रिया ऑटोमॅटिक सुरु आहे,’ असं इंडिगोकडून सांगण्यात आलं आहे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:34 PM 10/Dec/2025