Lok Sabha discussion: संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून दररोज सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आहेत. पहिल्या आठवड्यात एसआयआरच्या मुद्द्यावरून विरोधकांनी लोकसभा आणि राज्यसभा दणाणून सोडली होती. त्यामुळे दोन्ही सभागृहात फारसे कामकाज झाले नाही. सोमवारपासून कामकाज सुरळीतपणे सुरू असून वंदे मातरमसह निवडणूक सुधारणांवर चर्चाही झाली.
दोन्ही सभागृहात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्याची एकही संधी सत्ताधारी आणि विरोधकांनी सोडली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी यांच्यासह सर्वच नेत्यांनी जोरदार भाषणे ठोकत आपले मुद्दे पटवून देण्याचा प्रयत्न केला. सभागृहातील बहुतेक विषयांवरील चर्चेदरम्यान असाच वाद पाहायला मिळतो.
आज मात्र राहुल गांधी यांनी अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला. मागील काही महिन्यांत दिल्लीसह मुंबई व अन्य काही प्रमुख शहरांमधील वाढत्या प्रदुषणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. दिल्लीतील प्रदुषणाने तर जगाचे लक्ष वेधले आहे. यावरून राहुल यांनी संसदेत चर्चा घडवून आणण्याची सूचना आज लोकसभेत केली.
लोकसभेत बोलताना राहुल यांनी या मुद्द्यावर चर्चा करताना यापूर्वी कुणी काय केले, यावरून आरोप-प्रत्यारोप करण्याऐवजी प्रदुषणाची समस्या रोखण्यासाठी काय करता येईल, यावर दोन्ही बाजूने सकारात्मक चर्चा घडवून आणण्याची विनंती केली. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये प्रत्येक मुद्द्यावर आरोप-प्रत्यारोप होतात, पण या मुद्द्यावर केवळ एकमताने चर्चा करू, त्यासाठी आमची तयारी असल्याचे राहुल यांनी स्पष्ट केले.
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनीही राहुल गांधी यांच्या सुरात सूर मिसळत चर्चा करण्याची तयारी दर्शविली. अनेक सदस्यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. बिझनेस अडव्हायझरी कमिटीपुढे याबाबत चर्चा करून संसदेत चर्चा घडवून आणण्याबाबत विचार केला जाईल, असे आश्वासन रिजिजू यांनी दिले. राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चेच्या शेवटी एक ठोस आराखडा सादर करण्याची विनंतीही यावेळी बोलताना केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:06 PM 13/Dec/2025














