रत्नागिरी : महसूल विभागातील प्रलंबित मागण्यांकडे होणारे दुर्लक्ष आणि विनाचौकशी होणाऱ्या निलंबनाच्या कारवाया यामुळे महसूल विभागात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या अन्यायाविरोधात ‘महाराष्ट्र राज्य महसूल अधिकारी व कर्मचारी समन्वय महासंघा’ने पुकारलेल्या राज्यव्यापी संपाच्या हाकेला प्रतिसाद देत रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी व कर्मचारी १९ पासून बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहेत. या संदर्भात जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य महसूल अधिकारी व कर्मचारी समन्वय महासंघाच्या रत्नागिरी जिल्हा संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी बुधवारी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांना निवेदन दिले. या वेळी सर्व अधिकारी उपस्थित होते. विधीमंडळात महसूल मंत्र्यांकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या केल्या जाणाऱ्या विनाचौकशी निलंबनाच्या घोषणांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या आर्थिक आणि सेवाविषयक अनेक मागण्या दीर्घकाळापासून शासनस्तरावर प्रलंबित आहेत. या मागण्या वारंवार पाठपुरावा करूनही निकाली काढल्या जात नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाने आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. समन्वय महासंघाने राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील महसूल यंत्रणा पूर्ण ताकदीने उतरणार आहे; मात्र, निवडणूक प्रक्रिया आणि नैसर्गिक आपत्तीशी संबंधित तातडीची कामे या आंदोलनातून वगळण्यात आली आहेत, जेणेकरून जनतेची अत्यावश्यक कामे अडकणार नाहीत, असे संघटनेतर्फे सांगण्यात आले.
दरम्यान, जोपर्यंत मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार होऊन त्या निकाली काढत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार महासंघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालये आणि इतर महसूल विभागांच्या कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 19-12-2025














