राज्यव्यापी शाळाबंद आंदोलन: शिक्षकांवर होणार कारवाई

रत्नागिरी : सहभाग अनुदानित शाळांमधील शिक्षकांनी ५ डिसेंबरला राज्यव्यापी शाळाबंद आंदोलन पुकारले होते. या आंदोलनात संपूर्ण महाराष्ट्रातून ९६ हजार ८०० शिक्षकांनी नोंदविला होता. त्यामध्ये जिल्ह्यातील ८५० शिक्षक सहभागी झाले होते. त्यामुळे या शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन कपात केले जाणार आहे. त्यांच्याविरोधात ही कारवाई केली जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

टीईटीमधील चुका दुरुस्त करणे, जुनी पेन्शन योजना सुरु करणे, अशैक्षणिक कामातून सुटका करणे, सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीची अंमलबजावणी करणे, शिक्षकांना पदोन्नती देणे, अशा विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील अनुदानित शाळांमधील शिक्षकांनी पाच डिसेंबरला राज्यव्यापी संपाचा इशारा दिला होता. संपात सहभागी न होण्याचे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले होते.

संपात सहभागी झाल्यास एक दिवसाचे वेतन कापले जाईल, असे आदेश काढले होते. मात्र, आदेशाकडे दुर्लक्ष करीत ५ डिसेंबरला राज्यातील असंख्य शिक्षकांनी या संपात सहभाग घेतला. प्राथमिक शिक्षकांसह माध्यमिक शाळेतील शिक्षकदेखील या संपात सहभागी झाले होते.

राज्यातून ९६ हजार ८०० शिक्षक संपात सामील झाले होते. आता या शिक्षकांवर मोठी कारवाई होणार आहे. त्यांच्या मासिक वेतनामधील एक दिवसाचे वेतन कापले जाणार आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेमधील ८५० शिक्षकांचे एक दिवसांचे वेतन कापले जाणार आहे.

त्यामुळे साधारणतः २५ लाखांहून अधिक रुपयांच्या वेतनाची कपात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून याबाबत गटविकास अधिकारी यांना आदेश देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. वेतनाचे बिल तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. शासनाच्या आदेशानुसार ही प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहे.

राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनात सहभागी होऊ नका, संपात सहभागी झाल्यास एक दिवसाचे वेतन कापले जाणार असल्याचा इशारा शिक्षण विभागाने आधीच दिला होता. तरीदेखील काही शिक्षकांनी संपात सहभाग घेतला. शिक्षक संपावर गेल्याने शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याचा ठपका ठेवत त्यांच्याविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. या कारवाईबाबत शिक्षक काय भूमिका घेणार याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांतील शिक्षकांनी त्यांच्या न्याय्य हक्कासाठी हा संप पुकारला होता. त्यांच्याविरोधात शिक्षण विभागाकडून कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे. शासनाने शिक्षकांबाबत घेतलेला निर्णय स्थिर राहणार की रद्द करणार, याबाबत आता शासनच ठरविणार आहे. दरम्यान, शाळा बंद आंदोलनात जे शिक्षक सहभागी झाले होते, त्यांच्यावर कारवाई करण्यावर शिक्षण विभाग ठाम असून, वेतन कपात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:23 19-12-2025