पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा…

नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर शुक्रवारी राजकीय वर्तुळातील सर्व मतभेद बाजूला ठेवून सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेते एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. अधिवेशनाच्या समाप्तीनंतर परंपरेनुसार आयोजित करण्यात आलेल्या चहापानाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांच्यातील संवाद आकर्षणाचे केंद्र ठरला.

या चहापानावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू हे सर्व एकाच ठिकाणी बसले होते. संसदेच्या सभागृहात एकमेकांवर तुटून पडणारे हे नेते चहापानावेळी मात्र अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात गप्पा मारताना दिसले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू, केंद्रीय मंत्री चिराग पासवान, लल्लन सिंग, किरेन रिजिजू, अर्जुन राम मेघवाल, राष्ट्रवादी काँग्रेस (शप) च्या खासदार सुप्रिया सुळे, समाजवादी पक्षाचे खासदार राजीव राय, धर्मेंद्र यादव आणि द्रमुकचे खासदार ए राजा यांच्यासह अनेक सभागृह नेते उपस्थित होते.

राजकीय कटुता विसरून संवाद
प्रियांका गांधी यांनी वायनाड पोटनिवडणुकीतून विजय मिळवून संसदेत प्रवेश केला आहे. खासदार म्हणून त्यांचे हे पहिलेच अधिवेशन होते. या चहापानादरम्यान पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी यांच्यात काही काळ संवाद झाला.

अधिवेशनाचा समारोप
यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले. संसदेचे हे हिवाळी अधिवेशन वादळी ठरले असले तरी, शेवटच्या दिवशी चहापानाच्या निमित्ताने का होईना, सर्व पक्षांचे नेते एका सुरात आणि हसतमुख चेहऱ्याने वावरताना दिसल्याने ‘संसदीय शिष्टाचाराचा’ नवा पायंडा पाहायला मिळाला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:04 19-12-2025