Vijay Hazare Trophy Live Streaming : रोहित-विराट उद्या उतरणार मैदानात! लढत कुठे अन् कशी Live पाहणार?, जाणून घ्या A टू Z

Vijay Hazare Trophy Live Streaming Marathi News : भारताच्या सर्वात मोठ्या देशांतर्गत एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा विजय हजारे ट्रॉफी 2025-26 ची सुरुवात 24 डिसेंबरपासून होत आहे. यंदाच्या हंगामात ही स्पर्धा अधिकच रंगतदार ठरणार असून रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासह टीम इंडियाचे अनेक स्टार खेळाडू मैदानात उतरताना दिसणार आहेत.

रोहित शर्मा मुंबईकडून, तर विराट कोहली दिल्लीकडून खेळण्याची शक्यता आहे.

या हंगामात विजय हजारे ट्रॉफीत एलीट ग्रुप, प्लेट ग्रुप आणि नॉकआऊट फेऱ्या असतील. सर्व सामने देशभरातील न्यूट्रल व्हेन्यूवर खेळवले जाणार असून, स्पर्धेचा अंतिम सामना 18 जानेवारीला होणार आहे. अशातच क्रिकेटप्रेमींसाठी मोठा प्रश्न आहे. हे सामने लाईव्ह कधी आणि कुठे पाहता येणार?

सकाळी 9 वाजता होणार सामन्यांची सुरुवात

24 डिसेंबर रोजी विजय हजारे ट्रॉफीतील पहिल्या सामन्यात दिल्ली विरुद्ध आंध्र प्रदेश असा सामना होणार आहे. हा सामना बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल. त्याच दिवशी मुंबई विरुद्ध सिक्कीम हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर रंगणार आहे. या स्पर्धेतील सर्व सामने भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजता सुरू होतील, तर नाणेफेक सकाळी 8.30 वाजता होईल.

विजय हजारे ट्रॉफी लाईव्ह कधी आणि कुठे पाहाल?

विजय हजारे ट्रॉफी 2025-26 मध्ये एकूण 119 सामने खेळवले जाणार आहेत. मात्र, सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण उपलब्ध नसेल. स्पर्धेतील निवडक सामन्यांचे लाईव्ह प्रक्षेपण तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनेल्सवर पाहू शकता. तसेच, निवडक सामन्यांची लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्हाला जिओहॉटस्टार अ‍ॅपवर पाहायला मिळणार आहे.

जाणून घ्या कोणता संघ कोणत्या गटात

  1. गट अ : केरळ, झारखंड, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पुडुचेरी, त्रिपुरा
  2. गट ब : विदर्भ, हैदराबाद, बंगाल, बडोदा, आसाम, उत्तर प्रदेश, चंदीगड, जम्मू आणि काश्मीर
  3. गट क : छत्तीसगड, महाराष्ट्र, गोवा, हिमाचल प्रदेश, पंजाब, मुंबई, उत्तराखंड, सिक्कीम
  4. गट ड : रेल्वे, आंध्र प्रदेश, हरियाणा, गुजरात, सौराष्ट्र, दिल्ली, सेवा दल, ओडिशा

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे विजेते ठरले झारखंड

विजय हजारे ट्रॉफीपूर्वी भारताची घरगुती टी-20 स्पर्धा सैयद मुश्ताक अली ट्रॉफी पार पडली होती. या स्पर्धेत ईशान किशनच्या नेतृत्वाखाली झारखंड संघाने इतिहास रचत पहिलेवहिले जेतेपद पटकावले. ईशान किशनने या स्पर्धेत 10 डावांत 57.44 च्या सरासरीने 517 धावा केल्या, ज्यात दोन शतके आणि दोन अर्धशतके समाविष्ट होती. अंतिम सामन्यात हरियाणाविरुद्ध त्याने 101 धावांची निर्णायक खेळी साकारली होती. या दमदार कामगिरीनंतर आता विजय हजारे ट्रॉफीसाठीही ईशान किशनकडे झारखंड संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:30 23-12-2025