रत्नागिरी : नाताळच्या सुटीसह जोडून आलेल्या विकेंड आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत. देशाच्या नकाशावर असलेले तीर्थक्षेत्र गणपतीपुळ्यात सुमारे १८ हजार पर्यटकांनी हजेरी लावली. रत्नागिरी, हर्णै, दापोली, गुहागरातही पर्यटकांचा राबता वाढल्याने उत्साहाचे वातावरण आहे.
नोव्हेंबरमध्ये तालुक्यातील गणपतीपुळे मंदिर व किनारा, मत्स्यालय, पावस येथे पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भातून मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करत आहेत. त्यात शालेय सहलींची भर पडल्याने जिल्ह्यातील समुद्रकिनारे, प्रमुख शहरांमध्ये पर्यटकांची गर्दी वाढली आहे. परिणामी, छोट्या-मोठ्या व्यावसायिकांच्या आर्थिक उलाढालीत मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यातील पर्यटनस्थळे गजबजली आहेत. गणपतीपुळे येथे दरदिवशी साधारणपणे ८ ते ९ हजार पर्यटक हजेरी लावत आहेत. नाताळची सुटी शनिवारी, रविवार अशी सलग आल्याने पर्यटक मोठ्या संख्येने जिल्ह्यात दाखल झाले आहेत. अनेकांनी महिनाभर आधी हॉटेल, निवास आरक्षित करून ठेवले होते. त्यामुळे छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनाही दिलासा मिळाला आहे. ही गर्दी एक जानेवारीपर्यंत राहील, असा अंदाज आहे. गणपतीपुळेत जिल्हास्तरीय सरस महिला बचतगटांचे प्रदर्शन सुरू असल्याने या प्रदर्शनालाही पर्यटकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर लाखो पर्यटक येथे येतील, असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाकडून जादा पोलिस कर्मचारी गणपतीपुळे येथे मागविण्यात आले आहेत. गर्दीच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. गणपतीपुळे मंदिर परिसर आणि समुद्रकिनाऱ्यावर पोलिसांकडून विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
मे महिना पावसात गेला. गणपतीचा हंगाम पावसात गेला, दिवाळीही पावसात गेली. त्यामुळे आताच्या हंगामाची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो. त्या दृष्टीने तयारीदेखील केली आहे. अपेक्षेपेक्षाही जास्त पर्यटक येत आहेत. साधारण पर्यटकांची तिप्पट गर्दी रत्नागिरीत होऊ लागली आहे. रूम तर मिळतच नाहीत, एवढी गर्दी झाली आहे. या हंगामामुळे मोठा दिलासा मिळेल. – गणेश धुरी, हॉटेल व्यावसायिक, रत्नागिरी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:16 26-12-2025













