चिपळूण : तालुक्यातील असुर्डे येथे खास बाब म्हणून नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात यावे, अशी मागणी आ. शेखर निकम यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे नुकतीच निवेदनाद्वारे मुंबईत भेटीदरम्यान केली. यावेळी ना. आबिटकर यांनी खास बाब म्हणून मंजुरी देण्याचे आश्वासन दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, असुर्डे (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्याची ग्रामस्थांकडून अनेक वर्षांपासून सातत्याने मागणी होत आहे. असुर्डे हे गाव मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत मध्यवर्ती ठिकाणी असून येथे आरोग्य सुविधांची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता भासत आहे. या गावालगतच साधारणतः २० ते २५ गावे असनू ती गावे दुर्गम व डोंगराळ भागात वसलेली आहेत.
असुर्डे व लगतच्या दुर्गम डोंगराळ भागातील रुग्णांना उपचाराकरिता गावापासून ३० ते ४० कि.मी. किंवा अधिक दूरच्या अंतरावरील रुग्णालयात जावे लागते. विशेषतः वयोवृद्ध, गर्भवती माता, मुलं आणि आकस्मिक वैद्यकीय आपत्कालीन रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
तरी सद्यस्थिती पाहता असुर्डे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन झाल्यास या गावासोबतच डोंगराळ व दुर्गम भागातील २० ते २५ गावांमधील गरीब व सर्वसामान्य नागरिकांना त्वरित व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध होईल.
तरी खास बाब म्हणून मौजे असुर्डे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्याच्या प्रस्तावास मान्यता मिळावी, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी निवेदनाद्वारे आरोग्यमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली आहे. यावेळी असुर्डे सरपंच पंकज साळवी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 AM 27/Dec/2025














