“मला बारामतीची माहिती, तितकी कुणाला नाही; युगेंद्र पवार मोठ्या मतांनी जिंकतील” : शरद पवार

मुंबई : बारामतीकरांची मला जेवढी माहिती आहे, तेवढी क्वचितच कोणाला असू शकेल. माझा बारामतीकरांवर पूर्ण विश्वास आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मला शक्ती देण्याचे काम बारामतीकरांनी केले आहे आणि याची सुरुवात १९६५ पासून ते आतापर्यंत आहे.

इतक्या निवडणुकींना उभा राहिलो. सुरुवातीच्या काळात मला इथे राहावे लागायचे. नंतरच्या कालावधीत माझी जबाबदारी बारामतीकरांनी घेतली. त्यामुळे या बारामतीकरांवर माझा पूर्ण विश्वास आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून युगेंद्र पवार यांना मोठ्या मतांनी विजयी करतील, असा मोठा दावा शरद पवार यांनी केला.

विधानसभा निवडणुकीची अर्ज भरण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीतही बारामती मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. सुरुवातीला अजित पवारांनी बारामतीतून न लढण्याचे संकेत दिले होते. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजित पवारांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. लोकसभेपासून राजकारणात अधिक सक्रीय दिलेले युगेंद्र पवार हे विधानसभा निवडणुकीत बारामतीतून निवडणूक रिंगणात उतरू शकतात, असा कयास बांधला जात होता. शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांना बारामतीतून उमेदवारी जाहीर केल्यानंतर यावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे आता बारामतीत काका-पुतण्यांमध्ये थेट लढत पाहायला मिळणार आहे.

अजित पवार आणि युगेंद्र पवार यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

बारामती मतदारसंघात युगेंद्र पवार आणि अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला. युगेंद्र पवार यांनी उमेदवारी अर्ज भरताना खासदार सुप्रिया सुळे आणि शरद पवार उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी युगेंद्र पवार यांना औक्षण करण्यात आले. यानंतर मीडियाशी बोलताना शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांच्या विजयाचा दावा करण्यात आला. हा प्रश्न फक्त बारामतीचाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा आहे. सर्वच जिल्ह्यांचा आढावा घेत आहे. लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने महाविकास आघाडीला प्रचंड प्रतिसाद दिला. महाराष्ट्राच्या जनतेचा आभारी आहे. जनतेला विश्वास देतो की, लोकसभेमध्ये जनतेने जी कामगिरी केलेली आहे, त्याची नोंद आम्ही कायम ठेवलेली आहे. आता महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. महाविकास आघाडीच्या वतीने सगळ्या जागा लढवत आहोत. सर्व जागांवर आम्ही एकवाक्यता आणण्याचा प्रयत्न करत आहोत, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीत काही वाद नाही. काही ठिकाणी दोन, दोन वाद उमेदवार दिले आहेत. त्यातून मार्ग काढण्यात येईल. उमेदवारी माघारी घेण्यासाठी अजून वेळ आहे. महाविकास आघाडीतील बहुसंख्य जागांवर एकमत झाले आहे. राहिलेल्या जागांवर तोडगा निघेल, असे शरद पवार म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:16 28-10-2024