मुंबईमध्ये रविवारी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची सभा पार पडली, या सभेत बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार फटकेबाजी केली. त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपचं हिंदुत्व हे ढोंग आहे.
काश्मीरमध्ये माता भगिनींचा सिंदूर पुसला गेला. त्यानंतर पाकिस्तानवर हल्ला करण्यात आला, ऑपरेशन सिंदूर केलं, आणि काही दिवसांनी याच पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळायला शहांचे चिरंजीव पुढे, हे यांचं देशप्रेम? असा टोला यावेळी उद्धव ठाकरे यांनी लगावला. उद्धव ठाकरेंनी काँग्रेसबरोबर आघाडी केली तर उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. मग फडणवीस अंबरनाथमध्ये तुम्ही असं काय सोडलं? ईदच्या दिवशी मोदींना लहानपणी मुस्लिम कुटुंबाकडून जेवण यायचं. सौगात ए मोदी केली तरी चालतं. आम्ही साधं अमर शेखचं नाव घेतलं तर आम्ही हिंदूत्व सोडलं? तुम्ही जे करताय ते काय अमरप्रेम आहे का? असा सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपला केला आहे.
दरम्यान पुढे बोलताना भाजपला एका वर्षात ३१०० कोटी रुपये निधी मिळाला. राज्य आणि केंद्र सरकार त्यांचं आहे. महापालिकेला विविध करांच्या माध्यमातून जवळपास १० हजार ९०० कोटींची थकबाकी येणं बाकी आहे. यांच्या तिजोऱ्या भरत आहेत. मुंबई लुटत आहे. तिकडे गणेश नाईक हे बोंब मारत आहेत, नवी मुंबई महापालिका कर्जबारी झाली आहे, असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं
७० हजार कोटींचे आरोप तुम्ही आणि मोदींनी केले, ढिगभर पुरावे दिले. केस चालू आहेत म्हणताय, पुरावे तुम्ही दिले ते पुरावे की जाळावे कोर्टाने सांगावं. तुम्हाला माहीत आहे पुरावे दिले, तर अजित पवारांना लाथ मारून हाकलून द्या. नसेल तर अजित पवारांची माफी मागा, हेच तुमचे चाळे चालू आहेत. लोकांना बदनाम करायचे, आयुष्यातून उठवायचे, असा घणाघात यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला. मी फडणवीस यांना आव्हान देतो आजही या व्यासपीठीवर या चर्चा करा. आदित्यला सांगतो. तुम्ही मुद्द्याचं बोला. या लोकांना महापालिका शिवसेनेने दाखवली. या गद्दाराला मंत्री करण्याचं पाप मी केलं, हे अभिमानाने नाही शरमेने सांगावं लागतं असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेना शिंदे गटाला देखील टोला लगावला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 12-01-2026














