रत्नागिरी : शासनाच्या सौर ऊर्जा प्रकल्पांतर्गत इमारती हरीत करण्याच्या उद्देशाने सर्व विभागाने सौर ऊर्जा प्रस्ताव मेढाच्या माध्यमातून द्यावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत आढावा बैठक आज झाली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, अपर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे आदींसह विभागप्रमुख उपस्थित होते.
प्र. जिल्हा नियोजन अधिकारी अमर पाटील यांनी संगणकीय सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली. यामध्ये प्रामुख्याने इतिवृत्तावरील कार्यपूर्तता, प्रलंबित प्रशासकीय मान्यता व दायित्व निधी मागणी, आयपास या संगणकीय प्रणालीचा १०० टक्के वापर करणे, महासंपत्ती पोर्टलवर पायाभूत सुविधांची नोंदणी याबाबतचा आढावा घेण्यात आला.
जिल्हाधिकारी जिंदल म्हणाले, मागील २ वर्षातील खर्च अतिरिक्त मागणी, यंदाचा खर्च याबाबत प्रत्येक विभागप्रमुखाने सादरीकरण करावे. ज्या विभागांकडे शासकीय जमिनी आहेत, त्या जमिनींवर अतिक्रमण रोखण्यासाठी संरक्षण भिंत बांधण्यासाठी प्रस्ताव द्यावेत. महासंपत्ती पोर्टलवर पायाभूत नोंदणीबाबतची कार्यवाही युध्दपातळीवर करावी. आयपास लॉगीन आणि त्याच प्रणालीवरुन सर्व प्रस्ताव यायला हवेत. झालेला खर्च, पूर्तता अहवाल डॅशबोर्डवर यायला हवा. त्याचबरोबर मे मध्ये झालेल्या बैठकीतील सूचनेनुसार केलेली कार्यवाहीबाबत पुर्तता अहवाल संबंधित विभागाने द्यावा, असे आवाहन करण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 AM 14/Jan/2026














