Maharashtra Weather Update: पुढील २४ तासांत महाराष्ट्रातील किमान तापमानात ३ ते ४ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता

Maharashtra Weather Update : राज्यात थंडी अचानक ओसरत असल्याचं चित्र पाहायला मिळत असून, हवामानातील सातत्यानं होत असलेल्या बदलांचा थेट परिणाम ऋतूचक्रावर होत आहे. (Maharashtra Weather Update)

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांत महाराष्ट्रातील किमान तापमानात ३ ते ४ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. परिणामी, हिवाळ्यात अपेक्षित असलेली गारठ्याची भावना कमी होत दिवसा उकाडा अधिक जाणवू लागला आहे.(Maharashtra Weather Update)

थंडीपेक्षा उकाडाच अधिक जाणवणार

गेल्या काही दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण, अधूनमधून हलक्या सरी आणि दमट हवामानाचा अनुभव नागरिक घेत आहेत. हवामान विभागाच्या माहितीनुसार, सध्या राज्यावर कोणतीही थंडीची लाट सक्रिय नाही. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ वगळता उर्वरित भागांमध्ये किमान तापमान वाढीचा कल स्पष्टपणे दिसून येत आहे.

दिवसा सूर्यकिरणांचा मारा तीव्र होत असून, दुपारच्या वेळेस उष्णतेचा त्रास वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आला आहे.

कोकणात दमट हवामान, घाटमाथ्यावर गार वारे

कोकण किनारपट्टीसह मुंबई, ठाणे, रायगड भागात दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे. सकाळी आणि संध्याकाळी काहीसा दिलासा मिळेल, मात्र दुपारच्या वेळेस उकाडा अधिक जाणवेल. घाटमाथ्यावर पहाटे आणि दिवस मावळल्यानंतर गार वारे सुटतील, पण दुपारी तापमान वाढल्याने उन्हाचा चटका सहन करावा लागणार आहे.

आयएमडीचा इतर राज्यांसाठी सतर्कतेचा इशारा

फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या इतर भागांमध्येही हवामानाचा मोठा बदल जाणवत आहे. पश्चिम उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला असून, धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र आहे.

हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, ओडिशा, छत्तीसगढ आणि झारखंडमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हलक्या हिमवृष्टीसह पावसाचा अंदाज आहे. पंजाबमध्ये १८, १९ आणि २२ जानेवारीला, तर हरियाणा आणि चंदीगडमध्ये १९ ते २२ जानेवारीदरम्यान पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. पश्चिमी झंझावात सक्रिय झाल्यामुळे उत्तर भारतात थंडी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

दक्षिण भारतातही पावसाचे ढग

दक्षिण भारतातही हवामानात बदल होत असून, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागात पावसाळी ढगांसह हलक्या सरींचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

नागरिकांना सतर्कतेचं आवाहन

हवामानातील हे बदल लक्षात घेता, नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्यासह प्रवास आणि दैनंदिन नियोजन करताना सतर्क राहावं, असं आवाहन हवामान विभागानं केलं आहे.

अचानक वाढणारा उकाडा, दमट हवामान आणि संभाव्य पावसामुळे पुढील काही दिवसांत राज्यातील वातावरण अधिक अस्थिर राहण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांना सल्ला

  • हवामानातील अचानक बदल, वाढता उकाडा आणि काही भागात पावसाची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस विशेष दक्षता घ्यावी, असा सल्ला कृषी तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे.
  • तापमान वाढत असल्यामुळे बागायती व भाजीपाला पिकांना पाण्याचा ताण येऊ शकतो. गरजेनुसारच सिंचन करावे व ठिबक/तुषार सिंचनाचा वापर करावा, असा सल्ला देण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 17-01-2026