रत्नागिरी : सुनीता साळवी यांना वाहनाने धडक देऊन फरार झालेल्या चालकावर कठोर कारवाई करावी तसेच शहरामध्ये अतिवेगाने व चुकीच्या पद्धतीने भरवस्तीमध्ये वाहन चालवून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन आज शिवसेना रत्नागिरी शहर महिला आघाडीच्या वतीने शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांना देण्यात आले.
काल (१८ जानेवारी) सायंकाळी ७ वाजता सौ. सुनीता साळवी यांना गोगटे जोगळेकर महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील लाला कॉम्प्लेक्सजवळ एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक देऊन उडवले व त्याच वेळी त्या ठिकाणी त्या पडलेल्या अवस्थेत असताना त्यांच्यावर वाहन चालवून वाहन चालकाने पलायन केल्याची घटना घडली आहे. या अपघाताचे गांभीर्य इतके होते की यात त्यांचा मृत्यू झाला.
ही घटना अत्यंत निंदनीय असून, आम्ही संघटनेतर्फे या घटनेला जबाबदार असणाऱ्या अज्ञात इसमाविरुद्ध तातडीने कारवाई करण्याची मागणी करत आहोत आणि या कारवाईमध्ये कुठेही शिथिलता येणार नाही याची आपण जबाबदारीने दखल घ्याल याची खात्री बाळगतो, असे या निवेदनात म्हटले आहे.
तसेच रत्नागिरी शहरात सध्या अनेक वाहन चालक शहरातील अंतर्गत रस्ते व मुख्य रस्त्यावरून अतिवेगाने वाहन चालवत आहेत. तसेच काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून एक दिशा मार्गाच्या नियमाचा भंग करत आहेत. या बाबींचा गांभीर्य पूर्ण विचार करून वाहनाच्या वेगावर, चालकांच्या वाहन चालवण्याच्या पद्धतीवर नियंत्रण आणण्यासाठी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, नगरसेविका वैभवी खेडेकर, पूजा पवार, श्रद्धा हळदणकर, सायली पाटील, निवेदिता कळंबटे, राजश्री पिलणकर, प्रीती सुर्वे, मेधा कुलकर्णी, रुकसाना जकी, दिशा साळवी, तसेच महिला पदाधिकारी प्रिया साळवी, रूपाली नागवेकर, योगिता खांडेकर, अवंती गोडपकर, समीक्षा वालम प्राजक्ता खेडेकर आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:43 PM 19/Jan/2026














