आगामी २०२६ टी२० विश्वचषक स्पर्धेआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगतात मोठे वादळ निर्माण झाले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव भारतात खेळण्यास नकार देणाऱ्या बांगलादेश क्रिकेट बोर्डाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आता कडक शब्दांत तंबी दिली.
या स्पर्धेत सहभागी व्हायचे की नाही, याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी आयसीसीने बीसीबीला २१ जानेवारी ही अंतिम मुदत दिली आहे.
बांगलादेशात हिंदूवर सुरू असलेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने कोलकाता नाईट रायडर्सला मुस्तफिजूर रहमानला संघातून बाहेर काढण्याचे निर्देश दिले. त्यानंतर ४ जानेवारी रोजी बीसीबीने अधिकृतपणे आयसीसीला पत्र लिहून भारतात विश्वचषक सामने खेळण्यास असमर्थता दर्शवली. बांगलादेशने ‘गट क’ मधील आपले सामने मुंबई आणि कोलकाता ऐवजी सह-यजमान श्रीलंकेत हलवण्याची मागणी केली.
दरम्यान, शनिवारी ढाका येथे झालेल्या दुसऱ्या बैठकीत आयसीसी शिष्टमंडळाने स्पष्ट केले की, वेळापत्रकात कोणताही बदल केला जाणार नाही. आयर्लंडचे सामने श्रीलंकेत होणार असल्याने बांगलादेशने त्यांच्या गटात जाण्याची विनंती केली होती, जी आयसीसीने फेटाळून लावली आहे. भारतामध्ये खेळाडूंच्या सुरक्षेला कोणताही धोका नसल्याचे लेखी आश्वासन आयसीसीने बांगलादेशला दिले आहे.
या वादात आता पाकिस्तानचीही एन्ट्री झाली. ‘जीईओ न्यूज’च्या वृत्तानुसार, बांगलादेश सरकारने सुरक्षेबाबत पाकिस्तानशी संपर्क साधला असून पाकिस्तानने त्यांना पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे. इतकेच नव्हे तर, पीसीबीने आयसीसीला कळवले आहे की, जर श्रीलंका उपलब्ध नसेल, तर पाकिस्तान बांगलादेशच्या सामन्यांचे आयोजन करण्यास तयार आहे. जर बांगलादेशने माघार घेतली, तर पाकिस्तानही आपल्या सहभागाचा फेरविचार करू शकतो, असे संकेत मिळत आहेत.
बांगलादेशने माघार घेतल्यास कोणाचा फायदा?
दरम्यान, २१ जानेवारीपर्यंत बांगलादेशने सकारात्मक निर्णय घेतला नाही आणि स्पर्धेतून माघार घेतली तर, आयसीसी त्यांच्या जागी क्रमवारीनुसार दुसऱ्या संघाचा समावेश करेल. अशा परिस्थितीत स्कॉटलंडला विश्वचषकात खेळण्याची लॉटरी लागू शकते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:17 19-01-2026














