रत्नागिरी : जगातील बाकी देश निकामी आहेत, असे नाही. पण वसुधैव कुटुंबकम् असे मानणारा भारत भक्ती, कर्म आणि ज्ञानामुळे जगात वेगळा आहे. ते टिकविण्याची जबाबदारी आपली आहे, असे प्रतिपादन जागतिक आध्यात्मिक गुरू आणि मानवतावादी नेते गुरुदेव श्रीश्री रवि शंकर यांनी येथे केले.
रविशंकर यांच्या उपस्थितीत रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर गुरुवारी, दि. २२ जानेवारी रोजी सायंकाळी भक्तिउत्सव आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते मार्गदर्शन करत होते. गुरुदेवांच्या रत्नागिरीतील पहिल्या भेटीच्या सोहळ्याला हजारो अनुयायी उपस्थित होते. हा सोहळा उबदार वातावरण, ज्ञान आणि चुकवू नये अशा चैतन्यदायी आध्यात्मिक ऊर्जेने भारून गेला होता. उपस्थितांना संबोधित करताना, गुरुदेवांनी भक्ती आणि प्रेमाच्या सारावर भाष्य केले. ते म्हणाले, ईश्वर दूर किंवा अमूर्त नाही. देव कुठेतरी वर बसलेला नाही; जिथे प्रेम आहे, तिथे तो प्रकट होतो, जेव्हा प्रेम अधिक गहिरे होते, तेव्हा ते संपूर्ण अस्तित्वाला रूपांतरित करते. जेव्हा मक्याला उष्णता दिली जाते, तेव्हा त्याचे पॉपकॉर्न बनते. त्याचप्रमाणे एक कणखर व्यक्तिमत्त्व जेव्हा भक्ती आणि सत्संगात कोमल होते, तेव्हा ते हलके, गोड, सुंदर आणि रसमय बनते. जीवन रसमय आणि चैतन्यपूर्ण असले पाहिजे.
भक्तीवर अधिक स्पष्टीकरण देताना, गुरुदेवांनी सांगितले की प्रेमामध्ये स्वतःला समर्पित करणे हीच भक्ती आहे. ते म्हणाले की, जेव्हा एखादी व्यक्ती प्रेमाच्या गहराईत विलीन होते, तेव्हा तेच प्रेम ध्यान आणि ज्ञान बनते. भक्ती आणि सत्संगात, व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचे तीक्ष्ण आणि कठोर पैलू मऊ होतात. त्यामुळे व्यक्ती पूर्णपणे आणि नैसर्गिकरीत्या फुलू शकते.
राग आणि द्वेष यांसारख्या भावनांच्या आंतरिक परिणामांवरही त्यांनी विचार व्यक्त केले आणि सांगितले की ज्यांना आपण माफ करू शकत नाही किंवा ज्यांच्याबद्दल आपण मनात राग बाळगतो, ते आपल्या मनावर स्वार होऊ लागतात. कालांतराने आपण नकळत त्यांच्यासारखेच वागू लागतो. भक्तीच्या रसात स्वतःला बुडवून घेतल्याने मन भीती आणि चिंतेपासून मुक्त होते, धैर्य निर्माण होते, आंतरिक संकल्प दृढ होतो आणि दुःख व एकाकीपणा नाहीसा होतो. जेव्हा आपल्या अहंकाराची भावना वितळते, तेव्हा आत जे उरते तीच खरी भक्ती, तोच खरा आदर असतो. जेव्हा जीवनात भक्ती आणि मनापासूनच्या भावना फुलतात, तेव्हा जीवन स्वतःच एक उत्सव, एक निरंतर आंतरिक सोहळा बनते.
गणेशोत्सव म्हणजे महाराष्ट्राची देशाला देणगी असल्याचे सांगून ते म्हणाले, लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप आणले. महाराष्ट्रानंतर कर्नाटक, गुजरात, राजस्थान अशा राज्यांमध्येही सण साजरा होऊ लागला. गणेशोत्सव अनेक भावनांना उजाळा देतो. जेव्हा आरती होते, तेव्हा प्रत्येकजण इतर सर्व काही विसरून जातो. लोभापोटी असो किंवा भक्तीपोटी, पण जेव्हा लोक कीर्तनात सामील होतात, तेव्हा संपूर्ण वातावरणच बदलून जाते. त्याचप्रमाणे, जेव्हा विठोबाची पालखी निघते आणि लोक पंढरपूरपर्यंत पायी चालत जातात, तेव्हाही आपल्याला भक्तीचा तोच आविष्कार दिसतो, जो आपल्या हृदयाला स्पर्शून जातो. गणेशोत्सवात वेगवेगळे मंडप घालून उत्सव साजरा करणे आणि त्यासाठी झगडा करणे यासारखा मूर्खपणा मात्र आणखी असू शकत नाही.
गुरुदेवांनी महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशावर भाष्य केले, “महाराष्ट्राच्या भूमीत शौर्याची जागृती नेहमीच भक्तीच्या जागृतीसोबतच झाली आहे.” श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान वारशाबद्दल गुरुदेव म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकांमध्ये जी भक्ती आणि धैर्य जागृत केले, ते आजही जिवंत आहे आणि भविष्यातही जागृत राहील. १२ व्या शतकात महाराष्ट्राने भक्तीची एक शक्तिशाली लाट अनुभवली. आज ती लाट पुन्हा एकदा परत आणण्याची जबाबदारी आपली आहे.
आयुर्वेद अंगीकारला पाहिजे. प्रकृतीला तो उपयुक्त आहे. जगात आयुर्वेद डॉक्टरांची मागणी वाढत आहे. अधिकाधिक मुलांना आयुर्वेदीय डॉक्टर बनवावे. त्यांच्यामार्फत भारताचा योग आणि आयुर्वेद जगभरात जाईल. गावागावातही आयुर्वेदाचा प्रसार व्हावा. देशात मानसिक रोगांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे घरोघरी ध्यानधारणेची आवश्यकता आहे. ध्यानाने, सुदर्शनक्रियेने व्यक्तीला विशालता येते. दृष्टिकोन विशाल असावा. मानवी जीवन क्षणिक आहे. त्यामध्ये भांटणतंटे नकोत. दुःख, सुख, मनासारख्या आणि मनाविरुद्ध घटना घडतच असतात. आहे ती स्थिती स्वीकारणे, कोणत्याही स्थितीत मानसिक संतुलन राखणे हीच जीवन जगण्याची कला आहे. रागद्वेषापासून भीतीपासून मुक्त जगणे आवश्यक आहे.
जीवनात चमत्कारांची कमतरता नाही. पण मानवी जीवन हेच चमत्कार आहे. प्रत्येक परिस्थितीत अदृश्य शक्तींची मदत होते, जीवनात आनंद मिळतो, प्रेम मिळते, हाच चमत्कार आहे. आपण भाग्यशाली आहोत. समस्या पूर्ण होतील. मात्र त्यासाठी आत्मविश्वास हवा. सुदर्शन क्रिया, ध्यान यामुळे ते साध्य होईल.
करोनाच्या काळात जगभरातील १० लाख डॉक्टर्स ध्यानात सहभागी झाले. त्याचा खूप फायदा झाल्याचे सांगून गुरुदेव म्हणाले की, स्वतःमधील ऊर्जा जागवणे, ध्यान, प्राणायाम, भक्ती असेल, तर जीवन रसमय होऊन जाते. नार्वेमध्ये झालेल्या संशोधनात असे सिद्ध झाले आहे की, सुदर्शनक्रियेमुळे शरीरातील जीन्स कॅन्सर, अल्झायमरसारख्या ३०० हून अधिक रोगांचे जीन्स निष्क्रिय होतात. ध्यानाचे हे महत्त्व लक्षात घेऊन जगभरातील १९३ देशांनी एकत्र येऊन विश्व ध्यान दिवस साजरा करायला सुरुवात केली. . ध्यानानेच समाजातही सुधारणा होणे शक्य आहे. याचाच एक भाग म्हणून ३ लाख मुलांवर इंट्युशन म्हणजे अंतःप्रेरणा प्रक्रिया पूर्ण केली आहे. मुंबईत एका मुलाचे अपहरण झाले. इंट्युशन प्रक्रिया पूर्ण केलेल्या एका मुलीने अंतर्ज्ञानाने नकाशा लावला आणि पोलिसांना त्या मुलाचा ठिकाणा सांगितला. त्यानुसार जाऊन पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले. याच क्रियेमुळे अनेकांना नैराश्य, अतिमहत्त्वाकांक्षा, आत्महत्येपासून बचावले. अध्यात्म व्यावहरिक आहे. जीवनात अध्यात्म आवश्यक आहे, असेही गुरुजींनी सांगितले.
रत्नागिरीकरांचे भाग्य उजाळले! जया सामंत यांनी व्यक्त केला आनंद
आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी तब्बल ४५ वर्षांनंतर रत्नागिरीला भेट देत रत्नागिरीकरांना आनंदी जगण्याचा मंत्र दिला. या अभूतपूर्व सोहळ्याच्या संयोजिका जया सामंत यांनी आपल्या भावना व्यक्त करताना या क्षणाचे वर्णन ‘रत्नागिरीकरांचे मोठे भाग्य’ असे केले. त्या म्हणाल्या की, “प्रत्यक्ष भगवानच आपल्या भेटीला आले असून त्यांनी आपल्याला जगण्याचा सुंदर मार्ग दाखवला आहे.” गुरुदेवांनी दिलेल्या ध्यानाच्या मार्गाचा अवलंब केल्यास आणि आजपासून संकल्प केल्यास तुमच्या समस्या सुटतील, तसेच तुमच्या कार्यक्षेत्रात नक्कीच सकारात्मक बदल घडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी जया सामंत यांनी उपस्थित रत्नागिरीकरांना आवाहन केले की, “आपण सर्वांनी हा मार्ग अंगीकारूया आणि गुरुदेवांना शब्द देऊया की, आम्ही रत्नागिरीत मोठ्या संख्येने ‘हॅप्पीनेस कोर्सेस’ (Happiness Courses) राबवू आणि हे कार्य इतके जोमाने करू की, आपले कौतुक करण्यासाठी गुरुदेवांना पुन्हा रत्नागिरीत यावे लागेल.”
रत्नागिरी दौऱ्यात गुरुदेवांनी धार्मिक नेते, राज्यातील नेते, वैद्यकीय क्षेत्रातील लोक, व्यावसायिक वर्ग, उद्योजक, महिला आणि तरुण अशा हजारो लोकांशी संवाद साधला. रत्नागिरीतील कार्यक्रमात राज्याचे आरोग्य राज्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी गुरुदेवांची भेट घेतली. श्रीश्री रविशंकर महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाचे ब्रँड अॅम्बॅसॅडर व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:49 23-01-2026














