BCB vs ICC T20 World Cup 2026 Row : टी-20 विश्वचषकाच्या तयारीला सध्या प्रचंड वेग आला आहे. मात्र या दरम्यान बांगलादेशने विनाकारण काही दिवस वाया घालवले आणि अखेर ही टीम आता विश्वचषकातून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे.
आयसीसीकडून याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे. टी20 विश्वचषक ठरलेल्या वेळापत्रकानुसारच सुरू होणार का, की त्यामध्ये बदल होणार?
भारतात खेळण्यास बांगलादेशचा नकार, आयसीसीचा निर्णय लवकरच
आयसीसीने दोन दिवसांपूर्वी स्पष्ट शब्दांत सांगितले होते की, टी-20 विश्वचषक खेळायचा असेल, तर बांगलादेशला भारतात येऊनच सामने खेळावे लागतील. यासाठी आयसीसीने बांगलादेश क्रिकेट बोर्डाला (BCB) एक दिवसाची मुदत दिली होती, जी आता संपली आहे. मात्र बांगलादेशने भारतात येऊन सामने खेळण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यांची इच्छा श्रीलंकेत सामने खेळण्याची होती, पण त्यावर कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे आता आयसीसीकडून मोठी घोषणा होणार असून, बांगलादेशच्या जागी कोणती टीम टी-20 विश्वचषक खेळणार, हे अधिकृतपणे जाहीर केले जाईल.
बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडला संधी
सध्याच्या रिपोर्टनुसार, बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडला टी-20 विश्वचषकात खेळण्याची संधी मिळणार आहे. स्कॉटलंडने याआधी क्वालिफायर खेळले होते, मात्र ते पात्र ठरू शकले नव्हते. पण आता बांगलादेश बाहेर पडल्याने स्कॉटलंडची लॉटरी लागली आहे. आयसीसीकडून अधिकृत घोषणा होणे फक्त बाकी आहे. स्कॉटलंडचा समावेश त्याच गटात होईल, ज्यामध्ये बांगलादेश होता. विश्वचषक सुरू होण्यासाठी केवळ 15 दिवस उरले असल्याने स्कॉटलंडला तातडीने तयारी करत आपला संघ जाहीर करावा लागणार आहे.
वेळापत्रकात बदल नाही, 7 फेब्रुवारीपासूनच स्पर्धेला सुरुवात
टी-20 विश्वचषकाच्या वेळापत्रकात कोणताही बदल केला जाणार नाही, हे जवळपास निश्चित आहे. बांगलादेशचे जे सामने होते, तेच सामने आता स्कॉटलंड खेळणार आहे. बांगलादेशचा पहिला सामना 7 फेब्रुवारीला, म्हणजेच उद्घाटनाच्या दिवशी वेस्ट इंडिजविरुद्ध कोलकात्यात होणार होता. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होणार आहे. त्यामुळे आयसीसीला अंतिम निर्णय लवकरात लवकर जाहीर करावा लागणार असून, स्कॉटलंडलाही झटपट तयारीला लागावे लागणार आहे.
टी-20 विश्वचषक 2026 च्या पहिल्याच दिवशी तीन सामने
टी-20 विश्वचषक 2026 च्या पहिल्या दिवशी एकूण तीन सामने खेळवले जाणार आहेत. पहिला सामना सकाळी 11 वाजता पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांच्यात कोलंबो येथे होईल. दुसरा सामना दुपारी 3 वाजता कोलकात्यात वेस्ट इंडिजचा असेल. तर तिसरा आणि दिवसातील सर्वात मोठा सामना संध्याकाळी 7 वाजता मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल, जिथे भारत आणि यूएसए आमनेसामने असतील. म्हणजेच स्पर्धेच्या पहिल्याच दिवसापासून चाहत्यांना थरारक क्रिकेटचा अनुभव मिळणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:54 23-01-2026














