पुणे : पुण्यातील पोलीस संचलन मैदानावर ७७ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
भारतीय संविधानाच्या बळावरच विविध भाषा, धर्म, जाती व संस्कृती असलेला भारत देश जगातील सर्वात मोठे व यशस्वी लोकशाही राष्ट्र म्हणून उभा आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या मूल्यांवर आधारित लोकशाही व्यवस्था टिकवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे जिल्हा पोलीस अधिक्षक संदीपसिंह गिल उपस्थित होते.
गोवा मुक्ती संग्राम, हैदराबाद-मराठवाडा मुक्ती संग्राम तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी हौतात्म्य पत्करलेल्या वीरांचेही त्यांनी अभिवादन केले. देशाची एकता, अखंडता व सार्वभौमत्व अबाधित राखण्यासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री तसेच शौर्य पुरस्कार विजेत्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केंद्र सरकारच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या शौर्य व सेवा पदक तसेच पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील मान्यवरांचा समावेश हा राज्यासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे अजित पवार यांनी नमूद केले. पोलीस, अग्निशमन, होमगार्ड व सुधारात्मक सेवांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांसह कला, उद्योग, समाजसेवा, क्रीडा, वैद्यकीय व कृषी क्षेत्रातील पद्म पुरस्कार विजेत्यांनी महाराष्ट्राची मान देशपातळीवर उंचावली असल्याचे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्यलढा व सामाजिक सुधारणांच्या चळवळीत पुण्याची भूमिका ऐतिहासिक व निर्णायक राहिल्याचेही त्यांनी सांगितले. शेती, उद्योग, व्यापार, सहकार, बँकिंग, आरोग्य व पायाभूत सुविधांच्या विकासात पुणे जिल्हा अग्रेसर असून आयटी हब, ऑटो हब आणि स्टार्टअप्सचे प्रमुख केंद्र म्हणून पुण्याची ओळख देश-विदेशातील तरुणांना आकर्षित करत असल्याचे पवार यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:36 26-01-2026














