Ratnagiri Hapus: यंदाच्या हंगामातली पहिली रत्नागिरी हापूस पेटी मार्केट यार्डात! दर काय?

पुणे : मार्केट यार्ड फळबाजारात हापूस आंबा दाखल होऊ लागला आहे. कोकणातील विविध भागांतून सध्या हापूस आंब्याची तुरळक आवक सुरू झाली आहे.

मार्केट यार्डातील व्यापारी सुधीर मनसुख यांच्या गाळ्यावर रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूर येथून हापूसच्या चार पेट्यांची आवक शुक्रवारी (दि.२३) झाली.

प्रत्येक पेटी ३ डझनाची आहे. घाऊक बाजारात प्रत्येक पेटीला १५ हजार रुपये दर मिळाला. या पेट्यांची खरेदी आंब्याचे व्यापारी युवराज काची यांनी केली.

हापूसच्या पेटीसह केशर आंब्याच्या एका पेटीची आवक झाली. याआधीही बाजारात कोकणातून हापूसच्या पेट्यांची आवक झाली आहे.

सद्य:स्थितीत आवक तुरळक असली तरी फेब्रुवारीच्या १५ ते २० तारखेदरम्यान हापूसची आवक सुरू होण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. येत्या काळात ही आवक वाढत जाणार आहे. आवक तुरळक असल्यामुळे दर अधिक आहे.

यावेळी बाजार समितीचे संचालक गणेश घुले, फळविभाग प्रमुख बाळासाहेब कोंडे, दादासाहेब बांदल, व्यापारी अजय वाखारे, नाना मस्के, शरद कुंजीर, प्रकाश भडकुंबे, प्रीतम परदेशी, बालाजी राठोडे, हुसेन मणियार, नाना राठोडे, हनुमंत शिवरे आदी उपस्थित होते.

येत्या १५ ते २० फेब्रुवारीपासून हापूसची आवक सुरू होईल. हंगामात आवक चांगली राहिल्यास दरही मागील वर्षीच्या तुलनेत कमी राहतील. हवामान पोषक असल्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा झाडांना फळधारणा अधिक असल्याने मागील वर्षीच्या तुलनेत यंदा दरही कमी असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. – युवराज काची, व्यापारी, मार्केट यार्ड

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 27-01-2026