रत्नागिरीत महायुतीचा विजयाचा निर्धार; जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी उदय सामंत यांच्या उपस्थितीत खलबते

रत्नागिरी (प्रतिनिधी): आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या रणधुमाळीसाठी रत्नागिरीत महायुतीने कंबर कसली आहे. शिवसेना उपनेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत आज महायुती समन्वयक समितीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील सर्व जागांवर भगवा आणि युतीचा झेंडा फडकवण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा संकल्प करण्यात आला.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात जागावाटप निश्चित

पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, महायुतीमधील जिल्ह्यातील जागावाटपाचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण समन्वयाने ठरला आहे. पक्षशिस्त आणि एकमेकांवरील विश्वास हाच आपल्या आगामी विजयाचा मुख्य पाया असणार आहे. युतीच्या सर्व नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये चांगला ताळमेळ असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

नगरपरिषदेच्या यशाची पुनरावृत्ती करण्याचा विश्वास

महायुतीच्या शक्तीचे महत्त्व सांगताना सामंत यांनी नगरपरिषद निवडणुकीचा दाखला दिला. सर्व घटक पक्षांनी समन्वयाने काम केल्यास काय मोठे परिणाम साधता येतात, हे आपण नगरपरिषद निवडणुकीत पाहिले आहे. तोच अनुभव, तोच आत्मविश्वास आणि तीच ऊर्जा घेऊन आपल्याला आगामी निवडणुकीत जनतेसमोर जायचे आहे, असे आवाहन त्यांनी केले. रत्नागिरी तालुक्यातील १० जिल्हा परिषद गट व २० पंचायत समितीचे उमेदवार निवडून आणणे, हेच महायुतीचे प्रमुख लक्ष्य असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

विजयाचे श्रेय नेतृत्वाला आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीला

रत्नागिरीत मिळणाऱ्या आगामी यशाचे संपूर्ण श्रेय हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वाला जाणार आहे. महायुतीची ही एकजूटच विजयाची सर्वात मोठी हमी आहे, असा विश्वासही उदय सामंत यांनी व्यक्त केला. या बैठकीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवीन चैतन्य निर्माण झाले असून प्रचाराची रणनीती आता अधिक वेगवान होणार आहे.

दिग्गज पदाधिकाऱ्यांची बैठकीला उपस्थिती

या बैठकीला भाजप जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, ॲड. विलास पाटणे, शिवसेना जिल्हाध्यक्ष राहुल पंडित, भाजपचे माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर, शिवसेनेचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष सुदेश मयेकर, तालुका अध्यक्ष बंडयाशेठ साळवी, बाबू म्हाप, भाजप तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे, भाजप महिला अध्यक्ष वर्षा ढेकणे, संजू साळवी, भाजप शहराध्यक्ष दादा ढेकणे तसेच महायुतीचे सर्व उमेदवार आणि प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 27-01-2026