Ajit Pawar Death, Jayant Patil Reaction: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते अजित पवार यांचा आज सकाळी बारामतीजवळ विमान अपघातात मृत्यू झाला. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार आज बारामतीमध्ये येत होते.
त्या सभांसाठी आज सकाळी अजित पवार मुंबईहून विमानाने बारामती येथे येत होते. हे विमान बारामती विमानतळावर उतरत असताना, लँडिंगवेळी झालेल्या गोंधळामुळे अपघात होऊन विमान जवळच्या शेतात कोसळले. या अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाल्याचे DGCAने सांगितले. या दु:खद घटनेनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
“राष्ट्रवादी परिवारातील आम्हा सर्व सहकाऱ्यांच्या आयुष्यातील आजचा दिवस सर्वात वाईट दिवस आहे असेच म्हणावे लागेल. अजितदादांच्या निधनाची बातमी ही अक्षरशः सुन्न करून टाकणारी आहे. अजितदादा आणि माझे गेल्या जवळपास ३५ ते ४० वर्षांपासूनचे मैत्रीपूर्ण संबंध होते. प्रदीर्घकाळ आम्ही एकत्र काम केले. महाराष्ट्राच्या राजकीय सार्वजनिक जीवनाला अजितदादा पवार यांच्याकडून अजून मोठ्या कार्याची अपेक्षा असतानाच अशा प्रकारे अजित दादांचे अपघाती निधन आम्हा सर्वांच्या राजकीय जीवनात एक कायमस्वरूपी पोकळी निर्माण करून गेलेले आहे. दादांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाचे जे नुकसान झाले आहे, ते नुकसान कधीही भरून निघणार नाही. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील एक सर्वाधिक उत्तम प्रशासक व एक अत्यंत मोठा लोकनेता महाराष्ट्राने कायमचा गमावला आहे. अजित दादांची उणीव कायम भासत राहील,” असे जयंत पाटील म्हणाले.
खासदार सुप्रिया सुळे यांची भावूक प्रतिक्रिया
या हृदयद्रावक घटनेनंतर राजकीय स्तरातून तीव्र शोक व्यक्त केला जात आहे. अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांची बहीण आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर “DEVASTATED” असे लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. संपूर्ण पवार कुटुंब आणि कार्यकर्त्यांवर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:26 28-01-2026














