गायक अरिजीत सिंह सध्या त्याच्या निवृत्तीच्या घोषणेमुळे चर्चेत आहे. अरिजीतने आता पार्श्वगायन न करण्याचा निर्णय घेतला आहे. आता तो फिल्ममेकिंग करणार असून स्वत:चं स्वतंत्र संगीत बनवणार आहे.
अरिजीतच्या या निर्णयानंतर चाहत्यांना धक्काच बसला. लाखो चाहते निराश झाले. इंडस्ट्रीतील इतर गायकांनी अरिजीतच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. गायिका श्रेया घोषालनेही मत व्यक्त केलं आहे.
गायिका श्रेया घोषालने लिहिले, “अरिजित सिंगच्या कारकीर्दीचा हा एक नवा टप्पा आहे आणि हा प्रतिभावान कलाकार आता पुढे काय नवीन देणार आहे हे ऐकण्यासाठी, बघण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी मी खरोखरच खूप उत्सुक आहे! मी याला कधीही एका युगाचा अंत म्हणणार नाही. त्याच्यासारख्या उच्च दर्जाच्या कलाकाराला पारंपारिक चौकटीत किंवा ठराविक साच्यात कधीच बांधता येत नाही.प्रिय अरिजित, आता उंच भरारी घेण्याची वेळ आली आहे!”

याशिवाय अनेक गायकांनी अरिजीतच्या या निर्णयावर मत व्यक्त केलं. उदित नारायण म्हणतात, ‘अरिजीतने खूप कमी वेळात चांगलं काम केलं. अवॉर्ड, नाव, प्रसिद्धी, पैसा, चाहत्यांची क्रेझ असं बरंच काही कमावलं. हे सगळं त्याने यशाच्या शिखरावर असतानाही जमिनीवर राहून पाहिलं. जर त्याला निवृत्ती घ्यायची असेल तर तो त्याचा निर्णय आहे पण तो संगीत सोडणार नाही. त्याचं नाव लोकांच्या मनात कायम असेल.”
अरिजीत सिंहच्या निर्णयाचं अनेकांनी स्वागत केलं. तर काहींनी आश्चर्य व्यक्त केलं.२००५ मध्ये त्याने ‘फेम गुरुकुल’ या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला. त्यानंतर २०११ मध्ये इमरान हाश्मीने भूमिका केलेल्या ‘मर्डर २’ या चित्रपटातील ‘फिर मोहब्बत’ या गाण्याद्वारे पार्श्वगायनाच्या क्षेत्रात पदार्पण केले. अरिजीतने आतापर्यंत विविध भाषांमध्ये ३०० पेक्षा जास्त गाणी गायली आहेत. २०१३ मध्ये ‘आशिकी २’ मधील ‘तुम ही हो’ या भावस्पर्शी गीतामुळे तो लोकप्रिय झाला. त्याने ‘चन्ना मेरेया’, ‘अगर तुम साथ हो’, ‘राब्ता’, ‘केसरिया’, ‘गेरुआ’, ‘ऐ दिल है मुश्कील’ आणि ‘चलेया’ यासारखी अनेक चार्टबस्टर गाणी गायली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:28 28-01-2026














