महायुतीमधील समज-गैरसमज दोन दिवसांत दूर होतील : खा. सुनील तटकरे

चिपळूण : महायुतीमध्ये जे समज गैरसमज आहेत किंवा काही मतदारसंघांत नाराजी आहे, त्या संदर्भात महायुतीचे पदाधिकारी आणि नेते यांच्यामध्ये दोन दिवसांत एकत्रित बैठक होऊन समन्वय साधला जाईल आणि ही नाराजी किंवा गैरसमज दूर केले जातील. आरपीआय हा देखील महायुतीचा घटक पक्ष आहे. त्यामुळे त्यांच्याशी देखील चर्चा करून महायुती भक्कमपणे ही निवडणूक लढेल, असा विश्वास राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व खा. सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.

महायुतीचे चिपळूणमधील उमेदवार शेखर निकम यांचा अर्ज भरण्यासाठी खा. तटकरे चिपळूण येथे आले होते. यावेळी खा. सुनील तटकरे म्हणाले, राज्यामध्ये २८८ जागा आहेत. या प्रत्येक मतदारसंघात जे काही समज-गैरसमज असतील ते येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आपण स्वतः, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असे सर्व नेते एकत्र बसून प्रत्येक मतदारसंघनिहाय चर्चा करू आणि सर्व घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी बोलून महायुती पूर्ण ताकदीने या निवडणुकीला सामोरी जाईल, याची खबरदारी आम्ही घेऊ, असा विश्वास खा. तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले, आरपीआय देखील महायुतीचा घटक आहे. त्यामुळे आरपीआयचे नेते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याबरोबर बोलून मार्ग काढला जाईल. त्यामुळे आठवले यांच्या नेतृत्वाखालील आरपीआय संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीबरोबर राहील, असा विश्वास खा. तटकरे यांनी व्यक्त करून आजच्या उत्स्फूर्त सहभागाने शेखर निकम यांनी जो अर्ज दाखल केला आहे, त्यामुळे ते निश्चितच विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:29 PM 29/Oct/2024