रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणूक: ४७२ उमेदवार रिंगणात! १५० जणांची माघार, ‘या’ तालुक्यात बंडखोरीचे आव्हान

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात येत्या ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी प्रचाराचा धुरळा आता अधिकच उडणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर जिल्ह्यात एकूण ४७२ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले असून, अनेक इच्छुकांनी माघार घेतल्याने लढतींचे चित्र आता स्पष्ट झाले आहे.

माघारीनंतरचे निवडणुकीचे चित्र

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी दाखल झालेल्या अर्जांपैकी एकूण १५० उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. यामध्ये जिल्हा परिषद गटातून ४९, तर पंचायत समिती गणातून १०१ उमेदवारांचा समावेश आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थाएकूण जागाएकूण अर्जमाघारअंतिम उमेदवार
जिल्हा परिषद५६२२६४९१५१
पंचायत समिती११२४४४१०१३२१
एकूण१६८६७०१५०४७२

तालुकानिहाय अंतिम उमेदवारांची संख्या

जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये उमेदवारांची संख्या खालीलप्रमाणे आहे. यामध्ये सर्वाधिक उमेदवार चिपळूण आणि रत्नागिरी तालुक्यात आहेत:

  • चिपळूण: जिल्हा परिषद (गट) २९, पंचायत समिती (गण) ५५
  • रत्नागिरी: जिल्हा परिषद (गट) २६, पंचायत समिती (गण) ४३
  • खेड: जिल्हा परिषद (गट) २०, पंचायत समिती (गण) ५३
  • संगमेश्वर: जिल्हा परिषद (गट) २०, पंचायत समिती (गण) ४२
  • दापोली: जिल्हा परिषद (गट) १६, पंचायत समिती (गण) ३१
  • राजापूर: जिल्हा परिषद (गट) १३, पंचायत समिती (गण) ३२
  • गुहागर: जिल्हा परिषद (गट) १२, पंचायत समिती (गण) २६
  • लांजा: जिल्हा परिषद (गट) ९, पंचायत समिती (गण) २६
  • मंडणगड: जिल्हा परिषद (गट) ६, पंचायत समिती (गण) १३

बंडखोरी रोखण्यात नेत्यांना यश?

अनेक ठिकाणी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने बंडखोरीचे सावट होते. रत्नागिरी, चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यांत बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता अधिक होती. मात्र, मंगळवारी दुपारपर्यंत वरिष्ठ नेत्यांनी केलेल्या शिष्टाईनंतर अनेक ‘बंडोपंतांनी’ आपले अर्ज मागे घेतले आहेत. तरीही काही जागांवर अपक्ष उमेदवारांमुळे प्रस्थापित पक्षांसमोर आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.

निवडणुकीवर अजित पवारांच्या निधनाचे सावट

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे सध्या राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा आहे. त्यामुळे २८ ते ३० जानेवारी दरम्यान होणाऱ्या मोठ्या प्रचारसभा रद्द करण्यात आल्या आहेत. तरीही, राज्य निवडणूक आयोगाच्या सूत्रांनुसार, मतदान नियोजित वेळेनुसार ५ फेब्रुवारी रोजीच होण्याची शक्यता आहे.


महत्त्वाच्या तारखा:

  • मतदान: ५ फेब्रुवारी २०२६ (सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३०)
  • निकाल: ७ फेब्रुवारी २०२६

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 29-01-2026