पुणे : राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार अनंतात विलीन झाले आहेत. दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी महाराष्ट्र लोटला होता. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अजित दादांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या दादाला निरोप देताना उपस्थित कार्यकर्त्यांनी अजित दादा अमर रहे च्या घोषणा दिल्या. देशाचे गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील सर्व वरिष्ठ नेते आणि अधिकारी उपस्थित होते. अंत्यसंस्कारावेळी कार्यकर्त्यांच्या अश्रुंचा बांध फुटला त्यांनी ‘परत परत या अजित दादा परत या’ अशी घोषणाबाजी केली.
अजित दादा यांचे पार्थिव सकाळी काटेवाडी येथील निवासस्थानी आणण्यात आले होते. बारामतीकरांनी काळजावर दगज ठेवत शेवटचं दर्शन घेतलं, त्यानंतर फुलांनी सजवलेल्या ट्रकमधून दादांची अंत्ययात्रा विद्या प्रतिष्ठानच्या मैदानाकडे नेण्यात आलेली, तेव्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूल मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर लाखोंच्या संख्येने जनगसागर लोटल्याचं पाहायला मिळाला. पार्थ आणि जय पवार या दोघा पुत्रांनी दादांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.
अजित पवार यांच्या अचानक निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. या धक्क्याने सर्वच जण हादरले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह देशभरातील अनेक दिग्गजांनी अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
अजित पवारांचा विमान अपघात कसा झाला?
मुंबई-बारामती मार्गावर उड्डाण करणारे व्हीएसआर व्हेंचर्स प्रा. लि. कंपनीचे ‘लिअरजेट ४५’ हे खासगी विमान २८ जानेवारी रोजी सकाळी बारामती विमानतळावर उतरण्याच्या प्रयत्नात भीषण अपघातास सामोरे गेले. या दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन वैमानिक आणि तीन प्रवासी होते. या अपघाताची चौकशी विमान अपघात तपास ब्यूरोकडून (एएआयबी) सुरू करण्यात आली आहे.
- २८ जानेवारीला सकाळी ०८:१८ वाजता विमानाने प्रथम बारामतीशी संपर्क साधला.
- विमान ३० नॉटिकल मैल अंतरावर असताना पुणे कंट्रोलने त्यांना दृश्य हवामान परिस्थितीत (व्हिज्युअल मेटेरॉलॉजिकल कंडिशन्स) उतरण्याची परवानगी दिली.
- वैमानिकांनी वारा व दृश्यमानतेबाबत विचारले असता वारा शांत असून, दृश्यमानता सुमारे ३००० मीटर असल्याचे सांगण्यात आले.
- धावपट्टी क्रमांक ११ वर अंतिम टप्प्यात असताना धावपट्टी न दिसल्याने पहिला प्रयत्न रद्द करून विमानाने गो-अराउंड’ घेतला.
- गो-अराउंड केल्यानंतर विमानाला त्याच्या स्थानाबद्दल विचारले असता वैमानिकाने धावपट्टी ११च्या फायनल अप्रोचवर असल्याचे सांगितले.
- ‘एटीसी ‘कडून त्यांना धावपट्टी दिसताच कळवण्यास सांगण्यात आले. त्या वेळी ‘धावपट्टी दिसत नाही, दिसल्यावर कळवतो’ असे सांगितले.
- वैमानिकाकाने काही क्षणांतच ‘धावपट्टी दिसत आहे’ असे कळवले.
- सकाळी ०८ : ४३ वाजता धावपट्टी क्रमांक ११ वर उतरण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, वैमानिकाकडून परवानगीबाबत प्रतिसाद मिळाला नाही.
- सकाळी ८:४४ वाजता धावपट्टीच्या टोकाजवळ आगीच्या ज्वाळा दिसल्या आणि आपत्कालीन सेवा घटनास्थळी पोहोचल्या.
- विमानाचे अवशेष धावपट्टी क्रमांक ११च्या ‘थेशोल्ड’च्या डाव्या बाजूला आढळून आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:15 29-01-2026














