Maharashtra Weather update: महाराष्ट्रावर अवकाळीचे सावट..!

जळगाव : जिल्ह्यात २७ जानेवारी रोजी झालेल्या अवकाळी पावसाने रब्बी हंगामाला मोठा फटका बसला आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसल्याने जिल्ह्यातील सुमारे २१ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके भुईसपाट झाली असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला.

आता फेब्रुवारी व मार्च महिन्यातदेखील अवकाळीचे संकट राहणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

यावर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने प्रकल्पांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध होता. तसेच नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे रब्बी पिके जोमात होती. मात्र, पीक काढणीला अवघ्या एका महिन्याचा कालावधी शिल्लक असतानाच पावसाने थैमान घातल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

पाऊस होण्याची शक्यता
हवामान अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, फेब्रुवारी व मार्च हे दोन महिने संक्रमणाचे महिने असतात, थंडीचा जोर कमी होऊ लागतो व तापमान वाढू लागते, तापमान वाढल्यामुळे समुद्राच्या पाण्याची वाफ होऊन बाष्पयुक्त ढंग तयार होतात, अशा परिस्थितीत कमी दाबाचे क्षेत्र किंवा वादळी स्थिती निर्माण होते, त्यामुळे अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्यांत दोन-तीन वेळा अवकाळी पाऊस होऊ शकतो.]

फेब्रुवारी व मार्च धोक्याचे…
फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात रब्बी पिकांची काढणी होते. मात्र, याच काळात राज्यातील काही जिल्ह्यांसह जळगाव जिल्ह्यात पुन्हा अवकाळी आणि वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. ‘एल निनो’च्या प्रभावामुळे वातावरणात सातत्याने बदल होत असून, जानेवारी महिन्यात बहुतांश काळ ढगाळ वातावरण राहिले आहे. आता थंडीची लाट येण्याची शक्यता कमी असून, फेब्रुवारीच्या मध्यापासून मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पुन्हा पावसाचे सावट राहू शकते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 31-01-2026