रत्नागिरीत २ फेब्रुवारीपासून ६४ व्या राज्य हौशी नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी

रत्नागिरी : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित केलेल्या चौसष्टाव्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी रत्नागिरीत २ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

स्पर्धेत राज्यभरातील विविध केंद्रांवर प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळविलेल्या ४७ संस्थांची नाटके २ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत सादर केली जाणार आहेत.

फेब्रुवारी महिन्याच्या २ तारखेपासून सुरू होणाऱ्या या नाट्यमहोत्सवाचे नियोजन दोन सत्रात करण्यात आले असून, सकाळी ११.३० आणि सायंकाळी ७.३० वाजता नाटकांचे प्रयोग होतील. त्यात ७, ८, १३, १४ आणि २८ फेब्रुवारी रोजी केवळ सकाळच्या सत्रात प्रयोग होतील, तर २१ फेब्रुवारीला फक्त सायंकाळी प्रयोग होणार आहे. रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहात सोमवार, २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजता स्पर्धेचा प्रारंभ होणार आहे. पहिल्या दिवशी दादरच्या ‘रेशनकार्ड’ या नाटकाने स्पर्धेची सुरुवात होणार आहे.

स्पर्धेत मंगळवार दि. १७ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता रत्नागिरीत केंद्रात प्राथमिक फेरीत प्रथम आलेले अग्निपंख (लेखक प्र. ल. मयेकर, दिग्दर्शक ओंकार पाटील, समर्थ रंगभूमी, रत्नागिरी) नाटक सादर होणार आहे. रत्नागिरीत केंद्रात दुसरे आलेले इठ्ठला (लेखक-दिग्दर्शक अमोल रेडीज, वीरशैव समाज, लांजा) हे नाटक बुधवार, २५ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता सादर होईल.

प्राथमिक फेरीत सिंधुदुर्ग केंद्रावर दुसरे आलेले वाट चुकलेलो देव (लेखक किशोर तळवडकर, दिग्दर्शक नंदकुमार तळवडकर) श्री राधाकृष्ण मंदिर देवस्थान, आचरा, मालवण या संस्थेचे नाटक रविवार, दि २२ फेब्रुवारीला सकाळी साडेअकरा वाजता, तर सिंधुदुर्ग केंद्रातील प्रतम क्रमांकाचे सूनबाई तोऱ्यात (लेखक गंगाराम गवाणकर, दिग्दर्शक राजेश गोवेकर) हे तुळस येथील वेताळ प्रतिष्ठानचे नाटक बुधवार, दि. २५ फेब्रुवारीला सायंकाळी साडेसात वाजता सादर करण्यात येणार आहे.नाटकांचे दैनंदिन तिकीट दर १५ आणि १० रुपये आहेत. रसिकांनी स्पर्धेचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:22 31-01-2026