देवरूख : येथील प्र. शि. संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या २८ व्या वार्षिक स्नेहसंमेलन “आरोहण 2के26” चे उद्घाटन संपन्न झाले. आंतरमहाविद्यालयीन कला, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचा समावेश असलेल्या या महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाला अॅडलर हेल्थकेअर देवरुखचे बिझनेस डेव्हलपमेंट जनरल मॅनेजर श्री. मंगेश प्रभुदेसाई प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित होते.
प्रथम दिपप्रज्वलनाने उद्घाटन समारंभाची सुरुवात करण्यात आली. यानंतर प्रमुख पाहुणे व अन्य मान्यवरांचे संस्थाध्यक्ष रवींद्र माने यांच्या हस्ते यथोचित स्वागत करण्यात आले. महाविद्यालयाच्या दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे आंबव ग्रामदेवता कालीश्रीच्या मंदिरामध्ये क्रीडाज्योत प्रज्वलित करून मैदानात मिरवणुकीने आणण्यात आली. संस्थाध्यक्ष रवींद्र माने यांच्या हस्ते या क्रीडाज्योतीची मैदानामध्ये स्थापना करण्यात आली व श्रीफळ वाढवून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सहसचिव दिलीप जाधव, प्राचार्य डॉ. महेश भागवत, उपप्राचार्य डॉ. अनिरुद्ध जोशी, राजेंद्र कदम, महाविद्यालयाचे सर्व विभागप्रमुख, तसेच महाविद्यालयाचे सांस्कृतिक समन्वयक प्रा. गणेश जागुष्टे, डॉ. अच्युत राऊत, प्रा. प्रियांका वनकर इ. मान्यवर उपस्थित होते.
यानंतर महाविद्यालयाच्या विविध विभागातील विद्यार्थ्यांच्या मानवंदना संचलन तुकड्यांनी निहाल नार्वेकर याच्या नेतृत्वात दिमाखदार ध्वजसंचालन सादर करून मान्यवरांना सलामी दिली. उपस्थित मान्यवरांकडून विद्यार्थ्यांना दाद लाभली. ध्वजाची मैदानात स्थापना केल्यानंतर सनान अल्जी याने सर्व खेळाडूना संपूर्ण स्पर्धांमध्ये खिलाडूवृत्ती व शिस्त जोपासण्याची शपथ दिली.
मुख्य कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले कि, महाविद्यालयामध्ये आजपासून बहुप्रतीक्षित असा कला व क्रीडा उत्सव सुरु होत आहे. यामध्ये आपली निर्णयक्षमता व आत्मविश्वास वाढविण्यासाठी तसेच आपल्या प्रतिभेला उजाळा देण्यासाठी विद्यार्थ्यांनी अधिकाधिक सहभाग घेण्याचे त्यांनी आवाहन केले व सर्वाना शुभेच्छा दिल्या.
यानंतर प्रमुख पाहुणे मंगेश प्रभुदेसाई यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले कि, कला क्रीडा स्पर्धा या विद्यार्थ्यांमधील विविध गुण वैशिष्टे मजबूत करण्याचे काम करतात. जीवनात खेळाला फार महत्व असून यामध्ये सहभागी होताना जिकण्यासाठी स्पर्धा न करता स्वतःशी स्पर्धा करायला हवी. उपजीविकेसाठी शिक्षण महत्वाचे आहेच पण त्याबरोबर विद्यार्थ्यांनी कोणतातरी कला किंवा क्रीडा प्रकारातील छंद जोपासावा. पुढे त्यांनी या महाविद्यालयाच्या स्नेह्संमेलनाचे आरोहण हे शीर्षक खूप कल्पक असल्याचे सांगून या समारंभाचा साक्षीदार होण्याची संधी दिल्याबद्दल संस्थेचे आभार व्यक्त केले व पुढील स्पर्धांसाठी विद्यार्थ्याना शुभेच्छा दिल्या. यानंतर संस्थाध्यक्ष रवींद्र माने यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात जीवनात मेहनत हाच यशस्वी होण्याचा प्रमुख घटक असल्याचे अधोरेखीत करताना विद्यार्थ्यांनी जोश, स्फूर्ती व जिंकण्याच्या जिज्ञासेतून या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले.
यानंतर दिलीप जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या मानवंदना संचालनाचा निकाल जाहीर केला. महाविद्यालयाच्या अंतिम वर्ष तुकडीने यामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला तर तृतीय वर्ष व द्वितीय वर्षाच्या तुकडीने अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला. राजेंद्र कदम यांनी परीक्षण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम अव्हेल व प्रांजल सावंत यांनी केले. शेवटी डॉ. अच्युत राऊत यांनी आभार प्रदर्शन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:29 PM 31/Jan/2026














