“मुलांच्या हाती कारच्या चाव्या आणि अमाप पैसे देणे अयोग्य” : सुप्रीम कोर्ट

पुण्यातील बहुचर्चित पोर्शे कार अपघात प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्याचा आरोप असलेल्या ३ आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला, पण त्याचवेळी पालकांच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत.

पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलासह मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी तीन आरोपींना सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला. तसेच मुलांना कारच्या चाव्या देणे आणि मौजमजेसाठी अमाप पैसा देणे हे मुळीच स्वीकारार्ह नाही, अशी टिप्पणी न्या. बी. व्ही. नागरत्ना आणि न्या. उज्जल भुयान यांच्या खंडपीठाने केली.

जामीन मिळालेल्या आरोपींची नावे

-अमर सतीश गायकवाड, आदित्य अविनाश सूद (वय ५२) आणि आशिष सतीश मित्तल (वय ३७) अशी जामीन मंजूर झालेल्या आरोपींची नावे आहेत. अमर गायकवाड याने रक्ताचे नमुने बदलण्यासाठी मध्यस्थाची भूमिका बजावली होती.

-अपघाताच्या वेळी मुख्य आरोपीसोबत असलेल्या इतर दोन अल्पवयीन मुलांच्या रक्ताच्या नमुन्यांऐवजी आदित्य सूद आणि आशिष मित्तल या दोघांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी वापरण्यात आले होते. या पुराव्यांशी छेडछाड केल्याप्रकरणी त्यांना गेल्या वर्षी १९ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती.

-रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी मुलाचे आई-वडील (विशाल आणि शिवानी अग्रवाल), ससून रुग्णालयाचे डॉ. अजय तावरे आणि श्रीहरी हळनोर, कर्मचारी अतुल घाटकांबळे यांच्यासह १० जणांना अटक करण्यात आली होती.

काय आहे प्रकरणाची पार्श्वभूमी?

१९ मे २०२४ रोजी पुण्याच्या कल्याणीनगर भागात दारूच्या नशेत असलेल्या १७ वर्षीय मुलाने पोर्शे कार चालवून दोन आयटी इंजिनिअरना धडक दिली, ज्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर गाडी चालक अल्पवयीन मुलगा असल्याने बाल न्याय मंडळाने आरोपी मुलाला ‘रस्ते सुरक्षा’ यावर ३०० शब्दांचा निबंध लिहिण्याच्या अटीवर जामीन दिला होता, ज्यावरून देशभर संताप व्यक्त झाला होता. पोलिसांनी फेरविचार याचिका केल्यावर त्याला बालसुधारगृहात पाठवले होते, पण जूनमध्ये उच्च न्यायालयाने त्याच्या सुटकेचे आदेश दिले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:58 09-02-2026